अलिबाग : तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत पंचायत हद्दीतील, तसेच तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर समुद्र किनारी असलेल्या सरकारी जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी स्थानिक पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीचा वरदहस्त, छुपा पाठिंबा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये केला आहे.
रायगड जिल्हा पर्यटनासाठी मिनी गोवा म्हणून ओळखला जात आहे. मुरुड, अलिबाग तालुक्यात वर्षाला लाखो पर्यटक येत असतात. याचा फायदा घेत अनेक ठिकाणी अनधिकृत व्यवसायांचे पेव फुटले आहे. तक्रार अर्जात रेवदंडा मोठे बंदर समुद्र किनार्या लगतचे अनधिकृत, बेकायदेशीर टेंट व्यवसाय स्थानिक महसूल विभाग, ग्रामपंचायत यांनी उद्ध्वस्त केल्याचे म्हटले आहे. परंतु अनधिकृत टेंट धारकांनी दादागिरी आणि मुजोरीने हे टेंट परत उभारल्याने स्थानिक मोठे बंदर ग्रामस्थांनी संप्तत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सदरची बाब स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील कारवाई होत नसल्याने या प्रशासनाचा छुपा वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत स्थानिक तलाठी शिघ्रे यांच्या निदर्शनास ही बाब आणली असता बेेकायदेशीर टेंट उद्ध्वस्त करूनही ते पुन्हा उभारले जातात त्याला आम्ही काय करणार, असे उत्तर दिल.े तर रेवदंडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही असेच उत्तर दिले. त्यामुळे कारवाईचे केवळ नाटक होत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासनाने टेंटधारकांची मुजोरी मोडून काढून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
टेंटची जागा गुरे चारण्याची
गेल्या वर्षी रेवदंडा आणि थेरोंडा समुद्र किनारी असलेले अनधिकृत टेंटसह बांधकामे प्रशासनाने उद्ध्वस्त केली. त्यावेळी मोठे बंदर येथील अनधिकृत टेंटसुद्धा उद्ध्वस्त केले. परंतु ते पुन्हा उभारण्यात आले असून, त्या ठिकाणी अनेक अनधिकृत व्यवसाय चालत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याचा वाईट परिणाम आसपासच्या नागरी वस्तीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टेंटची जागा गुरे चारण्याची असून, त्या ठिकाणी गुरे गेल्यास त्यांना जखमी होईपर्यंत मारझोड केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.