तब्बल साडेसहा कोटींचे वीज बिल थकल्याने महावितरणने ३३ ग्रामपंचायतींसह नगर पंचायतीच्या पथ दिव्यांची जोडणी तोडली आहे. परिणामी चार दिवसांपासून सुधागड तालुक्यातील जवळपास ९९ महसुली गावांसह वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांवर अंधार आहे. अशा वेळी कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, मालमत्ता आणि जीविताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय तायडे यांनी केले आहे. तालुक्यातील सरपंच संघटना आणि प्रतिनिधींनी सोमवारी पथ दिव्यांची वीज जोडणी तोडू नये महावितरणच्या स्थानिक कार्यालयाला निवेदन दिले. तसेच महावितरणच्या या भूमिकेबद्दल संतापही व्यक्त केला. पथ दिव्यांची बिले भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे असताना अचानक लाखो रुपये बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींना ही बिले भरणे शक्य नाही. यासाठी जिल्हा परिषदेकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे सिद्धेश्वरचे सरपंच उमेश यादव यांनी सांगितले.
पथ दिव्यांबरोबरच सध्या शाळा आणि पाणी वितरणाच्या जोडण्या देखील तोडल्या जात असल्याचे यादव यांनी सांगितले. तर पाली ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच विजय मराठे यांनी सांगितले की, पथ दिवे बंद असल्याने रात्री गावात काळोख पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महावितरणने ताबडतोब ही जोडणी पूर्ववत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शासनाने या संदर्भात लागलीच दखल घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुघलकी निर्णय घेणे योग्य नाही. याचा हकनाक त्रास सामान्य जनतेला होत आहे. रात्री साप, विंचू आदी सरपटणारे प्राणी, हिंस्त्र श्वापदे यासह चोरांची भीती वाढली आहे.
– सुनील साठे, अध्यक्ष, मनसे, सुधागड
थकीत वीज बिलांसदर्भात शासनाची धोरणे वेळोवेळी बदलत आहेत. महावितरणच्या अनाकलनीय भूमिकेमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून या संदर्भात उग्र आंदोलन केले जाईल.
– अमित गायकवाड, अध्यक्ष, वंचीत बहुजन आघाडी, सुधागड
ग्रामपंचायतींना बिल भरण्यासाठी पूर्वसूचना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील आदेश उच्च स्तरावरून आले आहेत. बिल भरल्यानंतर जोडणी पूर्ववत केली जाईल.
– जतीन पाटील, उप कार्यकारी अभियंता, महावितरण, पाली-सुधागड
हा शासनाच्या अखत्यारीतला विषय आणि धोरणात्मक निर्णय आहे. शासनाच्या आदेशानुसार महावितरण कदाचित कारवाई करत असेल. जिल्हा परिषदेकडून असे वीज बिल भरण्यासाठी कधीच फंड मिळत नव्हता.
– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
पाली परिसरात पथदिवे बंद आहेत. सर्वत्र अंधार असल्यामुळे रात्री पेट्रोलिंग करताना अडचणी येत आहेत. वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिक, व्यापारी संघटना, धार्मिक स्थळे आणि ज्वेलर्स दुकान मालक यांनी घर, दुकान आणि इमारतीसमोर किमान एक विद्युत दिवा सुरू ठेवावा.
– विजय तायडे, पोलीस निरीक्षक, पाली
हेही वाचा –
पोलीस महासंचालक संजय पांडे नाराज, लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र