रविंद्र जाडेजा सध्या अप्रतिम फलंदाजी करत आहे. त्यामुळे अष्टपैलू म्हणून बेन स्टोक्स इंग्लंडसाठी जितका महत्वाचा आहे, तितकाच जाडेजा भारतासाठी महत्वाचा असल्याचे विधान भारताचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ताने केले. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जाडेजा खेळू शकला नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. मेलबर्नला झालेल्या या कसोटीत जाडेजाने ३ विकेट घेतानाच पहिल्या डावात ५७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. जाडेजाच्या या अष्टपैलू कामगिरीने दासगुप्ता प्रभावित झाला.
जाडेजाच्या गोलंदाजीत सुरुवातीपासूनच सातत्य होते. मात्र, आता तो ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे ते पाहता, स्टोक्स इंग्लंडसाठी जितका महत्वाचा आहे, तितकाच जाडेजा भारतासाठी महत्वाचा झाला आहे. आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असे मला वाटत होते. जाडेजामध्ये मोठ्या धावा करण्याची क्षमता आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन त्रिशतके आहेत. सौराष्ट्रसाठी तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु, भारतीय संघात त्याला सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खेळावे लागते, असे दीप दासगुप्ता म्हणाला.
जाडेजा सुरुवातीला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करत नव्हता असे मला वाटायचे. २०१७ मध्ये त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते आणि त्यानंतर त्याने फलंदाजीत अधिक योगदान देण्यास सुरुवात केली. केवळ चांगली गोलंदाजी करून संघातील स्थान टिकवता येणार नाही हे त्याला कळले, असेही दीप दासगुप्ताने सांगितले.
Boxing day challenge conquered 🇮🇳💪
Together we stronger 🇮🇳
Soaring On 🙌💪Nice way to end the year 🇮🇳😉 Well done team 🙌 pic.twitter.com/hhPUWiCKbn
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) December 29, 2020