पॅरिसमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे. भारतीय महिला रिकर्व संघाने मेक्सिकोला पराभूत करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या महिला संघाने अंतिम फेरीत मॅक्सिकोचा पराभव केला. मॅक्सिकोचा ५-१ ने पराभव करत त्यांनी हे यश संपादन केलं आहे.
भारतीय महिला संघाच्या विजयानंतर जागतिक तिरंदाजीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भारतीय महिला संघाचं अभिनंदन करण्यात आलं आहे. या विजयाने ऑलिम्पिकच्या शेवटच्या क्वालिफायर फेरीतील पहिल्या टप्प्यात मिळालेल्या पराभवानंतर आलेली निराशा काहीशी दूर होईल.
India 🇮🇳 takes gold in Paris! 🥇🏹👏 #ArcheryWorldCup pic.twitter.com/punkObEOAq
— World Archery (@worldarchery) June 27, 2021
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र झालेल्या तीन महिला तिरंदाजांपैकी दीपिका कुमारी एक असून तिच्याकडून देशाकडून मोठ्या आशा बाळगल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ऑलिम्पिक खेळाडूंच्या संघर्षाचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांनी दीपिकाचे कौतुकही केलं.