श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिका श्रीलंकेने ०-३ अशी गमावली. या मालिकेतील अखेरचा सामना मागील शनिवारी पार पडला. त्यानंतर रविवारी सलामीवीर दानुष्का गुणथिलका, फलंदाज कुसाल मेंडिस आणि यष्टीरक्षक निरोशन डिकवेला हे श्रीलंकेचे तीन प्रमुख खेळाडू डरहम येथे फिरताना दिसले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, खेळाडूंना बायो-बबलच्या बाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र, गुणथिलका, मेंडिस आणि डिकवेला यांनी नियम मोडल्याने त्यांना श्रीलंका क्रिकेटने निलंबित केले. या तिघांचे बेशिस्त वागणे श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाला अजिबातच आवडले नाही.
क्रिकेट सोडून इतर गोष्टींवरच अधिक लक्ष
मी खेळाडूंना सोशल मीडियाचा वापरच करू दिला नसता. आताचे क्रिकेटपटू फेसबुक, इंस्टाग्राम यावर फोटो आणि व्हिडिओ टाकताना दिसतात. त्यांचे क्रिकेट सोडून इतर गोष्टींवरच अधिक लक्ष असते. त्यांना प्रसिद्धीचा हव्यास आहे. मी श्रीलंकेचा कर्णधार असतो, तर हे खेळाडू असे वागले नसते. हे बेशिस्त क्रिकेटपटू असे ऐकणार नाहीत. त्यांना सुधारण्यासाठी मला बहुदा दोन-तीनदा त्यांच्या कानाखालीच द्यावी लागणार, असे रणतुंगा म्हणाला.
माणूस म्हणून घडवण्याची गरज
नियम मोडणारे हे तिघेही सिनियर खेळाडू आहे. त्यांच्यापैकी एक (कुसाल मेंडिस) तर श्रीलंकन संघाचा उपकर्णधार आहे. त्यांची चौकशी होईल आणि त्यांना शिक्षाही होईल. परंतु, त्यांना समज आणि मार्गदर्शन दिले जाईल अशी मला आशा आहे. त्यांना केवळ क्रिकेटपटू म्हणून नाही, तर माणूस म्हणून घडवण्याची गरज आहे, असेही रणतुंगाने नमूद केले.