कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा युएईत होणारी आयपीएल स्पर्धा आता सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून प्ले-ऑफला सुरुवात झाली आहे. युएईमध्ये उष्ण वातावरण असल्याने यंदा आयपीएलच्या पूर्वार्धात बहुतांश संघ नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याला पसंती देत होते. परंतु, मागील एका आठवड्यात बरेच संघ नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. युएईमधील वातावरण आता थोडे थंड होत असल्याने दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे झाले आहे, असे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला वाटते.
आयपीएल सुरु होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. स्पर्धा सुरु झाली तेव्हाचे वातावरण आणि आताचे वातावरण यात बराच फरक आहे. आता वातावरण साधारण सहा अंश सेल्सियसने कमी झाले आहे. तसेच तुम्ही मैदानावर पडणारी खेळाडूंची सावली पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की, सूर्यास्ताची वेळ बदलली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम खेळपट्टीवर होतो. स्पर्धेच्या पूर्वार्धात दुबई आणि अबू धाबी या दोन ठिकाणांवर संघांना धावांचा पाठलाग करताना फारसे यश मिळत नव्हते. मात्र, मागील सात-आठ दिवसांत दुसऱ्या डावात फलंदाजी करणारे संघ जिंकत आहेत. आता सूर्यास्त लवकर होत असल्याने पहिल्या डावात गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांत मदत मिळत आहे. दुसऱ्या डावात मात्र गोलंदाजांना ही मदत मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे आता दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे झाले आहे, असे सचिन म्हणाला.
The weather has played a subtle yet important role in how the matches have unfolded in the @IPL.
Here are my thoughts on how playing conditions & dew may have impacted the game.#SachInsight #IPL2020 pic.twitter.com/S5pYMieqyC
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 5, 2020