भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीने पाकिस्तान विरोधातील सामन्यापूर्वीच माइंड गेमला सुरूवात केली आहे. पाकिस्तान विरोधातील सामन्यासाठी अतिरिक्त ताण आणि प्लॅनिंगसाठी विराटने नकार दिला आहे. विराटने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेतच अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पाकिस्तानविरोधातील मॅचसाठी स्टेडिअममध्ये माहोल नक्कीच वेगळा असेल, पण आमची मानसिकता आणि तयारी यामध्ये कोणताही बदल नसल्याचे विराटने स्पष्ट केले.
रविवारी म्हणजे २४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात विराटने स्पष्ट केले आहे की, यामध्ये कोणतीही शंका नाही की पाकिस्तान एक टॅलेंटेड टीम आहे. पाकिस्तानसोबत नेहमीच आमचा चुरशीचा सामना असतो. पण आम्ही यंदाच्या विश्वचषकामध्ये चांगला खेळ करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. सध्या मी प्लेइंग इलेव्हनवर बोलत नाही, पण आमची टीम ही नक्कीच एक चांगला समतोल असलेली टीम असेल असा विश्वास विराटने यावेळी बोलून दाखवला.
भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा दोन्ही टीमची रणनिती ही विशेष अशी तयार होतेच. पण या सामन्याच्या निमित्ताने आम्ही कोणतीही विशेष अशी प्लॅनिंग केलेली नाही असेही विराट म्हणाला. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत विराटला भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने प्रश्न विचारण्यात आले. या सामन्यासाठी माहोल खूपच वेगळा आहे, पण कोणतीही वेगळी रणनिती आखली नसल्याचे विराटने स्पष्ट केले आहे.
विराटने या रणनितीच्या निमित्ताने एक प्रकारे स्पष्ट केले की, आम्ही पाकिस्तान संघाला जास्त महत्व देत नाही. पाकिस्तानची टीम ही इतर कोणत्याही देशासारखीच टीम असल्याचे विराटने या माइंड गेममधून स्पष्ट केले. एखाद्या कोणत्याही सामन्यासारखाच हा सामना असल्याचे कोहलीने यावेळी स्पष्ट केले. विराटच्या या वक्तव्याने आता पाकिस्तानच्या संघाचे प्रेशर वाढले आहे. पाकच्या टीमला जास्त महत्व न दिल्याने आता संपुर्ण प्रेशरचा बॉल पाककडे ढकलण्याचा प्रयत्न विराटने या वक्तव्याच्या माध्यमातून केला आहे. तसेच संपुर्ण प्रेशर आता पाकिस्तानकडे सरकवण्याची विराटची ही स्ट्रॅटेजी आहे.
दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने या सामन्यासाठी १२ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या या संघाचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे. तर सिनिअर ऑलराऊंडर शोएब मलिकलाही या सामन्यात जागा मिळाली आहे. पाकिस्तानच्या संघात खूप प्रसिद्ध खेळाडूंची नावे नसली, तरीही पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी यंदाचा सामना पाकिस्तान जिंकणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
आतापर्यंत पाकिस्तानच्या संघाची पाचवेळा भारतीय संघासोबत लढत झाली आहे. या पाचही सामन्यात भारतालाच यश मिळाले आहे. पहिल्या टी २० वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला टी २० विश्वचषक जेतेपदाचा मान मिळाला होता. या सामन्यामध्ये मिसबाह उल हकच्या फलंदाजीने भारताकडून सामना दूर नेला होता. पण अखेर जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर भारताने शेवटच्या षटकात या सामन्यावर पकड मिळवत जेतेपदाचा मान मिळवला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर मिसबाल उल हक बाद झाला आणि भारताने हा सामना जिंकला.