टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाचा दुसरा सामना नेदरलॅंडशी झाला. या सामन्यात भारताने 56 धावांनी नेदरलॅंडवर विजय मिळवला असून, टी-20 विश्वचषकातील भारताचा हा दुसरा विजय आहे. याआधी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. अटीतटीच्या लढतीत भारताने हा सामना जिंकला होता. (India Beat Netherlands By 56 Runs In T20 World Cup)
भारत आणि नेदरलॅंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव याने अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने 180 धावांचे आव्हान नेदरलॅंडसमोर ठेवले होते. भारताने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात के. एल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. पहिल्या सामन्यातही राहुल लवकर बाद झाला होता. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तो मोठी खेळी साकारतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण राहुल यावेळी पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला 9 धावांवर समाधान मानावे लागले. पण रोहितने त्यानंतर 53 धावांची खेळी साकारली. रोहित यावेळी 53 धावांवर बाद झाला खरा, पण त्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची चांगली भागीदारी झाली.
या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची अभेद्य भागीदारी रचली. कोहलीने यावेळी 44 चेंडूंत नाबा 62 धावांची खेळी साकारली. पण त्याच्यापेक्षा आक्रमक खेळी ही सूर्याकडून पाहायला मिळाली. कारण सूर्याने तुफानी फटकेबाजी करत फक्त 25 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 51 धावांची खेळी साकारली. अखेरच्या चेंडूवर सूर्याने आपले अर्धशतक साजरे केले.
भारताने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलॅंडला चांगली फलंदाजी करता आली नाही. भारताच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच भारताला यावेळी दणदणीत विजय साकारता आला. भारताचा हा विश्वचषकातील दुसरा विजय ठरला. यापूर्वी भारताने पहिला विजय पाकिस्तानच्या सामन्यात मिळवला होता. आता हा दुसरा विजय साकारत त्यांनी स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे आणि एकही पराभव त्यांना पत्करावा लागलेला नाही.
हेही वाचा – T-20 : ‘या’ खेळाडूचा विक्रम मोडत सूर्यकुमार यादवने रचला इतिहास