भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करता आला नाही. साहा फलंदाजीत दोन डावांत मिळून केवळ १३ धावा करू शकला, तसेच यष्टिरक्षणात त्याने एकही झेल पकडला नाही. साहाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात ४ कसोटी सामने खेळले असून त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. त्यामुळे आता मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने साहाच्या जागी रिषभ पंतला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संधी दिली पाहिजे, असे मत भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी व्यक्त केले.
मी निवड समितीचा अध्यक्ष होतो, त्यावेळी आम्ही ठरवले होते की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये रिषभ पंत भारताचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज असेल. भारतात कसोटी सामने होत असतील, तेव्हा तुम्ही विशेष यष्टीरक्षक खेळवू शकता. भारतात सहाव्या क्रमांकानंतरच्या फलंदाजांवर फारशी जबाबदारी नसते. परंतु, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये यष्टिरक्षकाने धावा करणेही महत्वाचे असते, असे प्रसाद म्हणाले.
यष्टिरक्षणाच्या बाबतीत साहा उजवा असला तरी फलंदाजीत पंतचे पारडे जड आहे. पंतने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. यादौऱ्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पंत (३५० धावा) दुसऱ्या स्थानी होता. तसेच त्याने ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या सराव सामन्यातही शतक झळकावले होते.
💯
A cracking first-class century from @RishabhPant17 in just 73 balls at the SCG. He smashes 22 off the final over to bring up his 100.
9×4 6×6. BOOM. pic.twitter.com/Mg3M1WBYlg
— BCCI (@BCCI) December 12, 2020