भारताच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. त्यांनी अचूक टप्प्यावर चेंडू टाकत विकेट मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्यांना खेळपट्टीकडून मदत मिळाली नाही, असे मत इंग्लंडचा फलंदाज डाविड मलानने व्यक्त केले. हेडिंग्ले येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला होता. याचे उत्तर देताना इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावांची मजल मारत ३५४ धावांची मोठी आघाडी मिळवली. पहिल्या डावात भारताच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली होती. दुसरीकडे इंग्लंडच्या अव्वल तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके, तर कर्णधार जो रूटने शतक केले. पहिल्या दिवसानंतर खेळपट्टीमध्ये खूप बदल झाल्याचे मलान म्हणाला. आता गोलंदाजांची परीक्षा असल्याचे त्याला वाटते.
भारतीय गोलंदाजांनी अडचणीत टाकले
पहिल्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असताना विशेषतः पहिल्या तासानंतर खेळपट्टीमध्ये खूप बदल झाला. भारतीय गोलंदाजांनी अजिबातच वाईट गोलंदाजी केली नाही. त्यांनी अचूक टप्यावर चेंडू टाकत विकेट मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला (इंग्लंडच्या फलंदाजांना) बरेचदा अडचणीत टाकले. मात्र, त्यांना खेळपट्टीकडून फारशी मदत मिळाली नाही, असे मलानने सांगितले. तीन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मलानने १२८ चेंडूत ७० धावा केल्या. त्याने १२१ धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार रूटला उत्तम साथ दिली.
रूट इतरांपुढे आदर्श ठेवतो
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रूटने कुटुंबियांसमोर खेळताना वर्षातील सहावे आणि मालिकेत तिसरे शतक झळकावले. रूटच्या या कामगिरीविषयी मलान म्हणाला, रूट कायमच धावा करत असतो. तो ज्या वेगाने आणि ज्या सहजतेने धावा करतो, ते कौतुकास्पद आहे. तो स्वतः चांगली कामगिरी करत इतरांपुढे आदर्श ठेवतो. त्याने या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोलंदाजाने चूक केल्यास रूट धावा करतोच. त्यामुळेच तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. दुसऱ्या बाजूने त्याची फलंदाजी पाहताना खूप मजा येते.
हेही वाचा – ‘गांगुलीप्रमाणेच कोहलीही आक्रमक कर्णधार, पण दोघांमध्ये तुलना नको’!