भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. नॉटिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी होती, पण पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ झाला नाही आणि हा सामना अनिर्णित राहिला. ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत मात्र भारताने १५१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यांत भारताने पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रमुख ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला या दोन्ही सामन्यांत संधी मिळाली नाही. शार्दूल ठाकूरला दुखापत झाल्यानंतर लॉर्ड्स कसोटीसाठी अश्विनचा भारतीय संघात समावेश करण्यात येणार होता. परंतु, भारतीय संघाने अचानक निर्णय बदलल्याचे अश्विननेच सांगितले.
अचानक जोरदार पाऊस पडला
लॉर्ड्स कसोटीपूर्वी मजेशीर किस्सा झाला. मी त्या सामन्यात खेळणार होतो. ‘उष्णता वाढत आहे. त्यामुळे तू तयार रहा. तुला खेळण्याची संधी मिळू शकेल,’ असे मला सांगण्यात आले होते. परंतु, सकाळी आम्ही नाश्ता करायला आलो, त्यावेळी अचानक जोरदार पाऊस पडला. त्यामुळे ‘उष्णता वाढणार होती त्याचे काय झाले? मला सामन्यात संधी देण्याची आशा दाखवून मला निराश का केलेत?’ असे मी त्यांना विचारल्याचे अश्विन गमतीत म्हणाला.
शार्दूलच्या जागी ईशांतला संधी
लॉर्ड्स येथे झालेल्या कसोटी सामन्यापूर्वी शार्दूल ठाकूरच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या जागी फिरकीपटू अश्विनला की वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला संधी मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष होते. अखेर संघ व्यवस्थापनाने ईशांतला संधी दिली आणि त्याने चांगली गोलंदाजी करताना दोन डावांत मिळून पाच विकेट घेतल्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटीतही अश्विनला संघाबाहेर बसावे लागू शकेल.
हेही वाचा – कोहली सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची टीका