भारतात कोरोनाचा धोका वाढत असल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅडम झॅम्पाने काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने आयपीएल आणि भारतातील बायो-बबलवर जोरदार टीका केली होती. आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी बायो-बबल वातावरणात राहून खेळलो आहोत. माझ्या मते, भारतातील बायो-बबलचे वातावरण सर्वात असुरक्षित असल्याचे झॅम्पा म्हणाला होता. परंतु, झॅम्पाच्या या मताशी मुंबई इंडियन्सचा दक्षिण आफ्रिकन खेळाडू क्विंटन डी कॉक अजिबातच सहमत नाही. इतरांचे माहित नाही, पण मला भारतातील बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित वाटते, असे डी कॉकने स्पष्ट केले.
अजिबातच चिंता वाटत नाही
आम्हाला आमच्या (मुंबई इंडियन्स) डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला भारतातील बायो-बबलमध्ये पूर्णपणे सुरक्षित वाटते. इतरांचे माहित नाही, पण मला बबलमध्ये राहताना अजिबातच चिंता वाटत नाही. आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. इतर संघांतील खेळाडूंना बायो-बबलविषयी काय वाटते, हे मी सांगू शकत नाही. परंतु, मी आमच्या संघाच्या खेळाडूंविषयी बोलू शकतो. आम्हाला सर्वांना भारतातील बायो-बबलमध्ये सुरक्षित वाटत आहे. सामना खेळताना किंवा अगदी सराव करताना आम्हाला इतर गोष्टींचा विचार करावा लागत नाही, असे डी कॉक म्हणाला.
फलंदाजी करताना मजा आली
डी कॉकने गुरुवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ५० चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. हे त्याचे यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने हा सामना ७ विकेट राखून जिंकला. मुंबईचे सुरुवातीचे पाच सामने चेन्नईत झाले होते. तिथे धावा करणे खूप अवघड होते. मात्र, दिल्लीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना मजा आल्याचे राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर डी कॉकने सांगितले.