‘आमचा संघ गुणतक्त्यात तळाला आहे. मात्र, अगदी खरे सांगायचे तर आम्ही तितकाही वाईट खेळ केलेला नाही,’ असे मत किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने व्यक्त केले. राहुल यंदा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाचे नेतृत्व करत असून पंजाबला आठ पैकी केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे पंजाबचा संघ चार गुणांसह आयपीएलच्या गुणतक्त्यात तळाला आहे. त्यांचे दोन्ही विजय हे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाविरुद्ध आले आहेत. गुरुवारी झालेला आरसीबीविरुद्धचा सामना पंजाबने ८ विकेट राखून जिंकला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या आणि पंजाबने हे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर गाठत हा सामना जिंकला.
सर्वोत्तम खेळ न करणे निराशाजनक
आम्ही गुणतक्त्यात ज्या (आठव्या) स्थानावर आहोत, त्यापेक्षा आमच्या संघात कितीतरी जास्त क्षमता आहे. आम्ही तितकाही वाईट खेळ केलेला नाही. आम्ही आणखी सामने जिंकले पाहिजे होते. मात्र, मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करता न येणे हे निराशाजनक आहे. तुम्हाला जिंकण्याची किंवा पराभूत होण्याची सवय होऊन जाते. कोणत्याही संघाला हरायला आवडत नाही. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आमचा आतापर्यंतचा प्रवास बऱ्याच चढ-उतारांनी भरलेला होता. हा सामना जिंकत आत्मविश्वास वाढवण्याचा आमचा संघ म्हणून प्रयत्न होता, असे आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार राहुल म्हणाला. पंजाबच्या संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले असले तरी राहुलने फलंदाज म्हणून अप्रतिम खेळ केला आहे. तो सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.