जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १६४ धावांवर रोखले. बंगळुरूचा संघ सुरुवातीला बिनबाद ७१ अशा सुस्थितीत होता. मात्र, बुमराहने अवघ्या १४ धावांत ३ विकेट घेत बंगळुरूच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यामुळे मुंबईने बंगळुरूला १७० हूनही कमी धावांवर रोखले. मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो संघ गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावेल. तसेच हा संघ प्ले-ऑफ गाठणार हे जवळपास निश्चित होईल.
अबू धाबी येथे होत असलेल्या या सामन्यात मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत पुन्हा पोलार्डने मुंबईचे कर्णधारपद भूषवले आणि त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. बंगळुरूच्या डावाची चांगली सुरुवात झाली. त्यांचे सलामीवीर जॉश फिलिपे आणि देवदत्त पडिक्कल यांनी आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे पॉवर-प्लेमध्येच बंगळुरूच्या ५० धावा पूर्ण झाल्या.
फिलिपेने यानंतर धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ३३ धावांवर राहुल चहरने बाद केले. बुमराहने कर्णधार विराट कोहलीला केवळ ९ धावा करू दिल्या. तर एबी डिव्हिलियर्स १५ धावा करून बाद झाला. पडिक्कलने मात्र अप्रतिम फलंदाजी करत ४५ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. अखेर त्यालाही बुमराहने माघारी पाठवले. यानंतरच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे बंगळुरूला २० षटकांत ६ बाद १६४ धावाच करता आल्या.