भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नेथन लायनचा हा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. लायन कसोटीत सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फिरकीपटू मानला जातो. त्याने आतापर्यंत ९९ कसोटीत ३९६ विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्याच्यात ८०० विकेट घेण्याची क्षमता नाही, असे मत श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केले. कसोटीत सर्वाधिक विकेटचा विक्रम मुरलीधरनच्या नावे असून त्याने ८०० विकेट घेतल्या होत्या. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन माझा विक्रम मोडू शकेल, असे मुरलीधरन म्हणाला.
अश्विन माझा विक्रम मोडू शकेल, कारण तो उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणताही गोलंदाज ८०० विकेट घेऊ शकेल असे मला वाटत नाही. लायनमध्ये इतक्या विकेट घेण्याची बहुधा क्षमता नाही. त्याने आतापर्यंत जवळपास ४०० विकेट घेतल्या आहेत. परंतु, त्याला माझ्या विक्रमापर्यंत (८०० विकेट) पोहोचण्यासाठी अजून बरेच सामने खेळावे लागतील, असे मुरलीधरनने सांगितले. आतापर्यंत लायनने ३९६ विकेट घेतल्या असून अश्विनच्या ७४ कसोटीत ३७७ विकेट आहेत.
सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांच्या ६ डावांमध्ये १२ विकेट घेतल्या आहेत. या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथला बरेच अडचणीत टाकले आहे.