दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनला यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांत मोठ्या धावा करण्यात अपयश येत होते. त्याला सुरुवातीच्या सहा सामन्यांत एकदाही ४० धावांचा टप्पा पार करता आला नव्हता. मात्र, त्याने मागील चार सामन्यांत दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्स (नाबाद १०१) आणि दिल्ली कॅपिटल्स (नाबाद १०६) या संघांविरुद्ध सलग दोन शतके केली. आयपीएलमध्ये सलग दोन शतके करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. मात्र, सुरुवातीला त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावर टीका झाली होती. परंतु, लोकांच्या टीकेने मला काहीच फरक पडत नाही, असे धवन म्हणाला.
मला खेळायला आवडते
मला आनंदी राहायला आवडते. मी कोणत्याही गोष्टीचा ताण घेत नाही. लोक माझ्याबाबत काय बोलत आहेत, हे माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. लोकांच्या टीकेने मला काहीच फरक पडत नाही. तसेच मला खेळायला आवडते आणि त्यामुळे मला आनंद मिळतो. मी किती मेहनत घेतो, मी किती फिट आहे आणि मी सामन्याआधी किती सराव करतो, हे मला ठाऊक आहे. मला मिळालेल्या संधीचे मी सोने करू शकतो यावर माझा विश्वास आहे, असे धवन म्हणाला.
धावांचा वेग वाढवायचा होता
मला सुरुवातीला मोठ्या धावा करण्यात अपयश येत होते. मात्र, त्यानंतर मी प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगसोबत चर्चा केली. ‘तू चांगली फलंदाजी करत आहेस,’ असे तो मला म्हणाला. मला धावांचा वेग वाढवायचा होता. मी २० आणि ३० धावा करूनही खुश होतो, कारण माझ्या खेळीचा संघाला फायदा होत असल्याचे मला ठाऊक होते. मी सलामीवीर म्हणून माझी भूमिका चोख बजावत होतो. मात्र, आता अर्धशतके, शतके केल्याने माझा आत्मविश्वास वाढला असल्याचे धवनने सांगितले.