इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्ज संघानं आतापर्यंत विजयाचा नारळ फोडलेला नाही. सततच्या पराभावामुळं चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजावर टीका केली जात आहे. क्रिकेटप्रेमीही सध्या चेन्नईच्या विजयाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच आता चेन्नईच्या सतत होणाऱ्या पराभवावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी आणि चेन्नईच्या कर्णधारपदावर मोठं भाष्य केलं आहे. रवी शास्त्रींनी ‘रविंद्र जाडेच्या जागेवर दुसरा खेळाडू कर्णधार असायला हवा होता’, असं म्हटलं आहे.
“चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजा नव्हे तर फाफ डू प्लेसिस असायला हवा होता. जाडेजानं आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे” असं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं. शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई या दोन संघांमध्ये सामना झाला. मात्र या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या पर्वातील चेन्नईचा हा चौथा पराभव आहे.
“रविंद्र जाडेजासारख्या खेळाडूने खेळावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. चेन्नईने फाफ डू प्लेसिसला जाऊ द्यायला नको होते. फाफ हा सामन्याला कलाटणी देणार फलंदाज आहे. धोनीला कर्णधारपद नको होते तर त्याऐवजी फाफ डू प्लेसिसकडे ही जबाबदारी सोपवायला हवी होती. जाडेजाने एक खेळाडू म्हणून सामन्यात सहभागी व्हायला हवं होतं. कर्णधारपद नसल्यामुळे तो मुक्तपणे खेळू शकला असता. कर्णधार नसल्यामुळे जाडेजावर दबाव नसता”, असं ईएसपीए क्रिक इन्फोशी बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटलंय.
आयपीएलच्या पंधराव्या पर्वाला सुरुवात होऊ दोन आठवडे झाले आहेत. या पर्वातील सर्वच सामने रोमहर्षक होत असून वेगवेगळ्यां संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. असे असले तरी दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी आतापर्यंतचे सर्वच सामने गमावले आहेत. एकाही सामन्यात विजय प्राप्त करता न आल्यामुळे चेन्नई संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.
हेही वाचा – IPL 2022: पृथ्वी शॉने वेगवान खेळीच्या जोरावर मोडला वीरेंद्र सेहवागचा IPL मधील सर्वात मोठा विक्रम