रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने तब्बल चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्याने कर्णधार म्हणून जितकी दमदार कामगिरी केली आहे, तितकीच चांगली कामगिरी त्याने फलंदाज म्हणूनही केली आहे. त्यामुळे फलंदाज रोहितच्या नावेही अनेक विक्रम आहेत. सध्या सुरु असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आणि ही कामगिरी करणारा तो या स्पर्धेच्या इतिहासातील केवळ तिसरा फलंदाज आहे. त्याच्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना (५३६८) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली (५४३०) यांनी ही कामगिरी केली होती.
१९२ व्या सामन्यात टप्पा गाठला
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी आयपीएल स्पर्धेत ५००० धावा पूर्ण करण्यासाठी रोहितला आणखी केवळ २ धावांची आवश्यकता होती. त्याने त्याचा टीम इंडियातील सहकारी मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चौकार लगावत आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला. त्याने ही कामगिरी आपल्या १९२ व्या सामन्यात केली. या सामन्यापूर्वी रोहितने १९१ सामन्यांच्या १८६ डावांत ४९९८ धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि ३७ अर्धशतकांचा समावेश होता. रोहित आता सलामीवीर म्हणून खेळत असला तरी आयपीएलमध्ये बरीच वर्षे तो मधल्या फळीत खेळत होता. त्यामुळे त्याने केलेली ही कामगिरी विशेष आहे.
👉 5️⃣0️⃣0️⃣0️⃣ @IPL runs 👈 👏👏👏
Keep going, captain! 💙#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #KXIPvMI @ImRo45 pic.twitter.com/8BeN5wv4Cs
— Mumbai Indians (@mipaltan) October 1, 2020