दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्याप्रमाणेच चौथ्या कसोटीतही इंग्लंडचा डाव गडगडला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या भारताच्या फिरकी जोडगोळीच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांतच आटोपला. अष्टपैलू बेन स्टोक्सने अर्धशतक करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला इतरांची फारशी साथ लाभली नाही. मागील कसोटीत ११ विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या अक्षर पटेलने या सामन्याच्या पहिल्या डावात ६८ धावांत ४ विकेट घेतल्या. त्याला ४७ धावांत ३ विकेट घेत अश्विनने उत्तम साथ दिली. इंग्लंडच्या २०५ धावांचे उत्तर देताना भारताची पहिल्या दिवसअखेर १ बाद २४ अशी धावसंख्या होती.
Rohit Sharma and Cheteshwar Pujara take India to 24/1 by stumps on day one after their spinners bowled England out for 205.#INDvENG | https://t.co/6OuUwURcgX pic.twitter.com/kZShpWUXgi
— ICC (@ICC) March 4, 2021
रोहित, पुजाराची सावध फलंदाजी
भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. युवा सलामीवीर शुभमन गिलला जेम्स अँडरसनने पायचीत पकडले. गिलला या मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले असून या सामन्यात तो खातेही उघडू शकला नाही. तो बाद झाल्यावर अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा (३४ चेंडूत नाबाद ८) आणि चेतेश्वर पुजारा (३६ चेंडूत नाबाद १५) यांनी सावध फलंदाजी केल्याने भारताने आणखी विकेट गमावली नाही. पहिल्या दिवसअखेर भारताची १२ षटकांत १ बाद २४ अशी धावसंख्या होती.
हेही वाचा – स्टोक्सच्या अर्धशतकानंतर इंग्लंडचा डाव गडगडला; पहिला डाव २०५ धावांत गारद