सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल प्ले-ऑफच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०० अशी धावसंख्या उभारली. क्वालिफायर-१ चा हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. आयपीएलचा अंतिम सामना मंगळवारी होणारी आहे. आज झालेल्या सामन्यात गतविजेत्या मुंबईच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फटकेबाजी करत दिल्लीला सामना जिंकण्यासाठी २०१ धावांचे आव्हान दिले. दिल्लीकडून ऑफस्पिनर अश्विनने २९ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या.
आज दुबई येथे होत असलेल्या क्वालिफायर-१ च्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईच्या डावाची खराब सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्माला अश्विनने पायचीत पकडले. रोहितला खातेही उघडता आले नाही. यानंतर मात्र क्विंटन डी कॉक (२५ चेंडूत ४०) आणि सूर्यकुमार यादव (३८ चेंडूत ५१) यांनी अप्रतिम फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचली. मात्र, अश्विनने डी कॉक आणि किरॉन पोलार्डला (०) बाद करत मुंबईला अडचणीत टाकले. कृणाल पांड्याही १३ धावा करून बाद झाला. परंतु, अखेरच्या षटकांमध्ये किशन (३० चेंडूत नाबाद ५५) आणि हार्दिक पांड्या (१४ चेंडूत नाबाद ३७) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने २० षटकांत ५ बाद २०० अशी धावसंख्या उभारली.
78 runs from the final five overs 🤯💙
Are we in this together, Paltan?#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvDC pic.twitter.com/C4iIak9MhS
— Mumbai Indians (@mipaltan) November 5, 2020