भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील गोलंदाजांची निवड केली आहे. यंदा टी-२० वर्ल्डकप भारतात होणार होता. परंतु, भारतातील कोरोनाच्या स्थितीमुळे ही स्पर्धा आता युएई आणि ओमान येथे हलवण्यात आली आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंची निवड होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची भारतीय संघातील निवड निश्चित आहे, असे आकाश चोप्राला वाटते.
दोन अतिरिक्त वेगवान गोलंदाज?
टी-२० वर्ल्डकपमध्ये बुमराह, भुवनेश्वर आणि दीपक चहर हे माझ्या मते भारताचे प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. या तिघांव्यतिरिक्त भारताला आणखी किमान एका वेगवान गोलंदाजाची गरज भासेल किंवा ते दोन अतिरिक्त वेगवान गोलंदाजांचीही संघात निवड करू शकतील. भारताकडे वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा आणि युजवेंद्र चहल हे तीन फिरकीपटू आहेत, असे आकाशने सांगितले.
शमी, नटराजनला मिळणार संधी?
राखीव वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात मोहम्मद शमी आणि टी. नटराजन यांचा समावेश करण्यात येईल, असेही आकाशला वाटते. याबाबत तो म्हणाला, शमी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. परंतु, त्याची टी-२० वर्ल्डकपसाठी निवड होणे अपेक्षित आहे. नटराजन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार नसला, तरी त्यालाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारताकडे शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांचाही पर्याय आहे. यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाची संघात निवड होऊ शकेल असे मला वाटत नाही.