भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला, बरोबरीत संपला किंवा पावसामुळे होऊच शकला नाही, तर काय? कोणत्या संघाला विजेता ठरवण्यात येणार? असे प्रश्न सध्या भारतीय संघाला पडले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) या अंतिम सामन्यासाठी नियम घोषित केले जाण्याची भारतीय संघ प्रतीक्षा करत आहे. आयसीसी येत्या काही दिवसांत ‘प्लेईंग कंडिशन्स’ घोषित करणे अपेक्षित आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे खेळला जाणार आहे.
सर्व नियम आधीच कळणे गरजेचे
हा एखाद्या द्विपक्षीय मालिकेतील कसोटी सामना नाही. त्यामुळे या सामन्याबाबतचे सर्व नियम आम्हाला आधीच कळणे गरजेचे आहे. आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असे बीसीसीआयचा सिनियर अधिकारी म्हणाला. हा सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत राहिला, तर काय होणार? तसेच दोन्ही संघांचा एक डाव पूर्ण होण्याआधीच पावसामुळे हा सामना रद्द करावा लागल्यास काय? हे मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत. येत्या काही दिवसांत अंतिम सामन्याबाबतचे सर्व नियम घोषित होणे अपेक्षित आहे, असेही बीसीसीआयच्या या अधिकाऱ्याने सांगितले.
साऊथहॅम्पटन येथे क्वारंटाईन
भारतीय संघ पुढील महिन्याच्या सुरुवातीला लंडन येथे दाखल होणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांना साऊथहॅम्पटन येथे नेण्यात येईल. भारतीय संघ इथेच क्वारंटाईन होईल. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथहॅम्पटनच्या एजिस बोलमध्ये कसोटी सामना होणार आहे. हा सामना सुरु असताना भारतीय संघ या स्टेडियममधील हॉटेलमध्ये क्वारंटाईन असेल.