भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारताने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून पाच वेगवान गोलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे. यामध्ये मोहम्मद सिराजचाही समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे त्याने सोने केले होते. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा हे प्रमुख गोलंदाज संघात असतानाही सिराजला खेळवण्याचा भारतीय संघ विचार करत आहे. अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास दमदार कामगिरी करण्यासाठी सिराज सज्ज आहे.
सामना जिंकवून द्यायला आवडेल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा माझ्यासाठी वर्ल्डकपच्या सामन्याप्रमाणेच आहे. आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून हा अंतिम सामना आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास दमदार कामगिरी करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. मी अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उत्सुक आहे. मला माझ्या संघाला सामना जिंकवून द्यायला आवडेल, असे सिराज एका मुलाखतीत म्हणाला.
भारताची गोलंदाजांची फळी न्यूझीलंडपेक्षा दर्जेदार
तसेच न्यूझीलंडकडे उत्तम गोलंदाज असले, तरी भारताची गोलंदाजांची फळी त्यांच्यापेक्षाही दर्जेदार असल्याचे सिराजला वाटते. आमची गोलंदाजांची फळी ही न्यूझीलंडपेक्षाही मजबूत आहे. ‘मी अशीच कामगिरी करत राहिलो, तर खूप पुढे जाईन,’ असे विराटने (कोहली) मला सांगितले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात खेळण्यासाठी मी आतुर आहे, असेही सिराजने सांगितले.