कल्याण । कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील शिवाजी नगर, संतोषी माता मंदिर परिसरात टाकण्यात आलेली पाण्याची लाईन गेले 40 वर्षे जुनी आहे. त्यावर शून्य मेंटेनन्स केलेला असून नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. याबाबत वारंवार पालिका आयुक्त आणि प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने येथील माहिलांनी स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसी मुख्यालय गाठत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांची भेट घेत समस्या सोडविण्याची मागणी केली.
शिवाजी नगर परिसरात 40 वर्षापूर्वी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती. यानंतर काही वार्षांपुर्वी याठिकाणी ड्रेनेजलाईन बंदिस्त करण्यात आली. या ड्रेनेज लाईन मधून पाण्याची लाईन गेली आहे. पाईपलाईन जुनी झाल्याने ही पाईपलाईन जीर्ण झाली असून यामध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपते. हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरात येत असल्याने नागरिकांना हे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाब, अंगाला खाज येणे आदी समस्या उद्भवत आहेत. या समस्येबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख नगरसेवक मोहन उगले यांना समस्या मांडली. पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन मोहन उगले यांनी नागरिकांना दिले आहे. तर याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांना विचारले असता, नागरिकांची ही समस्या तात्काळ निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगितले.