‘हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे’, असा आरोप भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘हे सरकार परत येणार नाही. कोणत्या तरी कारणाने देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे’, असे आंबेडकर म्हणाले आहेत. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. जागा वाटपासंदर्भात आपले काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेस आणि भारिपमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु होती. परंतु, ‘आमच्यात जागा वाटपावरुन मतभेद नाहीत’, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
‘आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आराखडा द्यावा’
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आराखडा द्यावा. परंतु, या मुद्यावर बोलण्यात अडचणी येत आहेत. निवडणुकांसाठी आम्ही कुठलीही मर्जीची जागा मागितलेली नाही. उलट ज्या ठिकाणी काँग्रेस ३ वेळा हरले आहे आणि ज्या जागांवर त्यांची उमेदवारी नाही, अशा जागा आम्हाला द्याव्या, अशी मागणी आम्ही केली आहे’.
‘राष्ट्रवादी लोक धडा शिकवतील’
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्षावर देखील टीका केली. ते म्हणाले की, ‘शरद पवार हे पुरोगामी आहेत. मात्र, त्यांचा पक्ष हा प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी हा पक्ष संभाजी भिडे चालवतात. या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. त्याचबरोबर काँग्रेसने कोणाबरोबर जायचे हा त्यांचा प्रश्न आहे. पण, राष्ट्रवादीला लोक धडा शिकवतील’.
‘युती झाली तर आमचा फायदाच’
प्रकाश आंबेडकर यांनी गेल्यावेळी देखील भाजप आणि शिवसेना संदर्भात वादग्रस्त टीका केली होती. शिवसेना ही भाजपची प्रेयसी आहे, असे ते म्हणाले होते. यावेळीदेखील ते तेच म्हणाले आहेत. त्याचबरोबर भाजप आणि सेनेची युती झाली तर आम्हाला सर्वाधिक फायदा होणार आहे. शिवाय, यामुळे प्रेयसीने केलेल्या वक्तव्यावर प्रियकराला उत्तर द्यावी लागतील आणि हे भाजला अडचणीचं आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
हेही वाचा – तेरी भी चूप, मेरी भी चूप – प्रकाश आंबेडकर