नागपूरः बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर एसटी धावली. चार प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला. ह्या मार्गावर एसटीचे तिकिट आहे ९०० रुपये. त्यामुळे एसटीला ३६०० रुपये मिळाले. मात्र या प्रवासात एसटीला साडेपंधरा हजार रुपयांचे डिझेल लागले तर साडेपाच हजार रुपयांचा टोल भरावा लागला. एसटीला या प्रवासासाठी एकूण २१ हजार रुपये खर्च आला, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.
ते म्हणाले, समृद्धी महामार्गावर औरंगाबाद ते नागपूर या प्रवासासाठी एसटीचे ९०० रुपये तिकिट आहे. या प्रवासासाठी एसटी धावली. त्यात चार प्रवासी होते. त्यामुळे एसटीला केवळ ३६०० रुपयांचे उत्पन्न मिळाले तर एसटीचा प्रवास खर्च २१ हजार रुपये झाला आहे. परिणामी या मार्गावर जे इंटर चेंज पाॅंईट आहेत, तेथे एसटी महामंडळाच्यावतीने एसटीसाठी स्टॅण्ड तयार करण्यात यावेत. अन्यथा समृद्धी महामार्गावरुन एसटी येणे शक्य होणार नाही, असे आमदार पडळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
समृद्धी महामार्ग हा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. या महामार्गाच्या कामाची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एका कारने त्यांनी या महामार्गावरुन प्रवास केला. त्यावेळी फडणवीस यांनी कार चालवली. त्यावरुनही चांगलीच राजकीय चर्चा रंगली होती.
त्यानंतर या महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घान झाले. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या उद्घाटनानंतर या महामार्गावरील टोलचा मुद्दा उपस्थित झाला. हा टोल सर्वसामान्यांना परवडणारा आहे का?, एसटीला येथील टोल परवडेल का?, असा मुद्दाही उपस्थित झाला होता. आमदार पडळकर यांनी विधानपरिषदेत एसटीच्या झालेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.