घरताज्या घडामोडीटीआरपी रॅकेटचा भांडाफोड!

टीआरपी रॅकेटचा भांडाफोड!

Subscribe

पोलिसांकडून फक्त मराठी, बिग सिनेमाच्या मालकांना अटक, टीआरपीच्या रॅकेटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे प्रमोटर्सही सहभागी?, मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीला चौकशीसाठी समन्स जारी, टीआरपी रॅके टमध्ये हंसा कंपनीच्या माजी कर्मचार्‍यांचा समावेश, टीआरपी वाढवण्यासाठी प्रत्येक घरामागे ४००-५०० रुपये देतात, अटकेतील व्यक्तिंकडून २० लाख रुपये जप्त, बँक खातीही सील

मुंबई पोलिसांनी टीव्ही चॅनेल्सकडून टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात येणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी फक्त मराठी आणि बिग सिनेमा या मराठी चॅनेलच्या मालकांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्यांच्या घरात टीआरपीसाठी बॅरोमीटर बसवण्यात येतात त्यांना महिन्याला ५०० रुपये देऊन टीआरपीशी छेडछाड करून कोट्यवधीच्या जाहीराती मिळवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच अर्णब गोस्वामी मुख्य संपादक असलेल्या रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्सही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप करून त्यांचीही लवकरच चौकशी करण्यात येईल असे सांगितले. मात्र अर्णब गोस्वामी यांनी परमबीर सिंह यांचे आरोप चुकीचे असून त्यांनी माफी मागावी अन्यथा कोर्टात खेचण्याचे आव्हान दिले आहे.

बनावट टीआरपीचे रॅकेटचे भांडाफोड मुंबई पोलिसांच्या सीआययुच्या पथकाने केला आहे. घरात विशिष्ट चॅनेल सुरू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा संशय असून टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हंसा कंपनीच्या माजी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. टीआरपीसाठी घरांमध्ये ५०० रुपयांपासून पैसे देण्यात आले होते. फक्त मराठी बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या तीन प्रमुख चॅनेल आरोपी आहेत. रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकार्‍यांना समन्स बजाविण्यात येणार आहे. सहभागी असणार्‍या सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. कितीही मोठा आरोपी असला तरी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

- Advertisement -

बँक खाते तपासले जात आहे. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू असून यात रिपब्लिक टीव्हीनेही अशाप्रकारे पैसे घेऊन टीआरपी वाढवल्याचा संशय आहे. अन्य चॅनेलबाबतही चौकशी सुरू असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. सिंह यांनी सांगितले की, हे रॅकेट बनावट टीआरपीचे आहे. टेलिव्हिजन जाहिरात इंडस्ट्री सुमारे 30 ते 40 हजार कोटी रुपयांची आहे. टीआरपी दराच्या आधारे जाहिरात दर ठरविला जातो. ज्या वृत्तवाहिनीचा टीआरपी जास्त त्यांना जाहिराती जास्त मिळत असतात. टीआरपीमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम महसुलावर होतो. याचा काही लोकांना फायदा होतो तर काही लोकांना नुकसान होते. टीआरपी मोजण्यासाठी बीएआरसी ही एक संस्था आहे. ते वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावतात. देशात सुमारे 30 हजार बॅरोमीटर स्थापित केले गेले आहेत. मुंबईत सुमारे 10 हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसाबरोबर काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवर माहिती शेअर करत असल्याचे समोर आले आहे.

आपण घरी असाल किंवा नसाल, चॅनेल चालू ठेवा. काही लोक जे अशिक्षित आहेत, त्यांच्या घरी इंग्रजी चॅनेल वापरले जात होते. आम्ही हंसाच्या माजी कामगारांना अटक केली आहे. या आधारे तपास वाढविण्यात आला. दोन जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या काही साथीदारांचा शोध घेत आहे. काही मुंबईत आहेत तर काही मुंबईबाहेर आहेत. ते चॅनेलनुसार पैसे द्यायचे. पकडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले असून त्यात आठ लाख रुपयांची रोकड आहे, असे सिंह म्हणाले.

- Advertisement -

रिपब्लिक टीव्हीनेही टीआरपी वाढवल्याचा संशय
टीआरपी रॅकेटचा फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू असून यात रिपब्लिक टीव्हीनेही पैसे घेऊन टीआरपी वाढवल्याचा संशय आहे. ज्यांचा इंग्रजीशी संबंध नाही त्या घरातही ५०० रूपयांच्या मोबदल्यात दिवसभर इंग्रजी चॅनेल लावले जायचे. रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स, डायरेक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शंका आहे. त्यांना लवकरच समन्स पाठवून त्यांचीही चौकशी करण्यात येईल. सर्व तपास केंद्र सरकारकडेही पाठवला जाईल.
-परमबीर सिंह, पोलीस आयुक्त, मुंबई.

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांंचे आरोप चुकीचे
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी रिपब्लिकन टीव्हीच्याविरोधात चुकीचे आरोप केले आहेत. रिपब्लिकन टीव्हीचे टीआरपी वाढवण्याच्या प्रकारात नाव आहे, असा बार्कचा एकही रिपोर्ट नाही. आम्ही सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना सवाल विचारले म्हणून त्यांनी हे सर्व घडवून आणले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याविरोधात आम्ही कोर्टात मानहानीचा दावा करणार आहोत. त्यांनी अधिकृतरित्या माफी मागावी आणि कोर्टात जाण्यास तयार राहावे. आम्हाला सत्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
-अर्णब गोस्वामी, मुख्य संपादक, रिपब्लिकन टीव्ही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -