एप्रिल महिन्यात झालेल्या २७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तेलंगणा सरकारकडून अहवाल मागविला आहे. तेलंगणा उच्च-माध्यमिक शिक्षण मंडळाने चुकीचा निकाल लावल्यामुळे एप्रिल महिन्यात २७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. या संदर्भात तेलंगणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण यांच्या नेतृत्वात एका प्रतिनिधी मंडळाने जुलै महिन्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती आणि उच्च- माध्यमिक परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळाबाबत माहिती दिली होती. या प्रकरणाची योग्य शहानिशा करण्यासाठी राज्य सरकारकडून अहवाल तसेच न्यायिक समिती स्थापन करण्याची मागणी सुद्धा लक्ष्मण यांनी केली होती. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस पी मुरलीधर राव , आमदार राजा सिंह आणि अन्य महत्वाचे नेते उपस्थित होते.
काय आहे नेमके प्रकरण?
तेलंगणा उच्च-माध्यमिक शिक्षण मंडळाने १८ एप्रिल रोजी ११ वी आणि १२ वी चे निकाल जाहीर केले होते. ज्यात ८ लाख ७० हजार ९२४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. मात्र, निकाल जाहीर केल्यानंतर ३ लाख २८ हजार ४०० विद्यार्थ्यंना अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. हा धक्का सहन न झाल्याने २७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते.
हेही वाचा – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची रणबीर – आलियाशी भेट