शहापूर ग्रामीण उपजिल्हा हॉस्पिटल उभारण्यात आले खरे, पण या हॉस्पिटलमध्ये पुरेसे तज्ज्ञ डॉक्टरच दिले गेले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांअभावी हे हॉस्पीटलच अत्यवस्थ असल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासी रुग्णांची हेळसांड होत आहे. येथील तुटपुंज्या यंत्रणेवरच सर्व हॉस्पीटलचा भार पडल्याने येथील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर असल्याचे चित्र आहे.
ओपडीत केस पेपर काढून तपासणीसाठी येणार्या रुग्णांवर किरकोळ स्वरुपाचे उपचार केले जातात. त्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत. गंभीर किंवा मोठ्या आजारांसाठी या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत. त्यामुळे रुग्णांना ठाणे सिव्हील रुग्णालय व मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पाठवले जात आहे. बालरोग तज्ज्ञ, फिजिशिअन सर्जन, वैद्यकीय अधिक्षक, भूलतज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, ह े डॉक्टरच गेल्या अनेक वर्षांपासून येथे नाहीत. तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत, तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे.
पदे मंजूर पण डॉक्टर नाहीत
उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 100 खाटांची सोय करण्यात आली आहे. तसेच या हॉस्पिटलसाठी डॉक्टरांची एकूण 15 पदे मंजूर असताना प्रत्यक्षात अवघे 9 पदे भरलेली आहेत. तर एकूण 6 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिक्षक, वैद्य अधिकारी शस्त्रक्रिया, स्त्रीरोगतज्ज्ञ अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. शहापूरसारख्या ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर्स तयार नसल्याचे कारण उपजिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर येथील खासगी डॉक्टरांचा व्यवसाय चालावा म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी सरकारी सेवेतील डॉक्टरांना ठेवले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या अपुर्या आणि रिक्त संख्येबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे उपजिल्हा हॉस्पिटलचे प्रभारी अधिक्षक राजेश म्हस्के यांनी सांगितले.
सोनोग्राफी सिटीस्कॅन व्यवसाय तेजीत
सोनोग्राफी तज्ज्ञ हे पद देखील कंत्राटी पद्धतीने भरल्याने मंगळवार व बुधवार या दोनच दिवस येथे रुग्णांच्या सोनोग्राफी केल्या जात आहेत. तर इतर दिवशी सोनोग्राफी सेवा बंद असते, सिटीस्कॅन मशीन आहे. पण रेडिओलॉजिस्ट हे पदच येथे भरलेले नसल्याने सिटी स्कॅनसाठी व सोनोग्राफीसाठी जादा पैसे मोजून गरीब रुग्णांना खासगी सेंटरवर जाण्याची वेळ येत आहे.