घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राने आता अर्थव्यवस्थेसाठी लॉकडाऊन उठवायला हवा - शरद पवार

महाराष्ट्राने आता अर्थव्यवस्थेसाठी लॉकडाऊन उठवायला हवा – शरद पवार

Subscribe

महाराष्ट्राने आता हळूहळू लॉकडाऊन उठवायला हवं, असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. अर्थव्यवस्थेसाठी आपण सर्वत्र साथीच्या रोगाचा सामना करत असतानाही अधिक क्रियाकलाप सुरू करणं महत्वाचं आहे, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्राने व्यवसाय सुरु करण्यासाठी लॉकडाऊन हळूहळू उठवायला हवा, असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. राज्यातील व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत उद्योजकांशी सरकार चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं. केंद्राने जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज ‘क्षुल्लक’ आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सुरळीत चालू आहे, असं देखील ते या मुलाखतीत म्हणाले.

महाराष्ट्र हे भारताचे सर्वात श्रीमंत राज्य आहे आणि कोरोनाचा फटका पण राज्याला बसला आहे. “केंद्राच्या मनात काय आहे हे मला माहिती नाही. परंतु, मला वाटते, आता आपण अधिकाधिक काम सुरू केलं पाहिजे. व्यवसाय, उद्योग, कारखाने, कामगारवर्ग आणि एकूणच अर्थव्यवस्थेसाठी आपण सर्वत्र साथीच्या रोगाचा सामना करत असतानाही अधिक क्रियाकलाप सुरू करणं महत्वाचं आहे,” असं पवार म्हणाले. ते म्हणाले, “आम्ही सरकारमधील सर्व पक्ष आणि उद्योगांचे मालक आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करीत आहोत की आपण पुढे कसे जाऊ शकू.”

- Advertisement -

पॅकेज अयशस्वी अपेक्षा 

महानगर असलेल्या दिल्ली आणि बंगळुरु यांच्या तुलनेत मुंबईसारख्या मोठ्या शहराला या पॅकेजमधून खूपच कमी मिळालं आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक उपायांवर पवार म्हणाले, “बहुतेक घोषणा बँका आणि इतर वित्तीय संस्थांविषयी असून केवळ कर्ज आणि क्रेडिट देतात. व्यवसायासह कोणत्याही क्षेत्रास मदत करण्यासाठी ठोस उत्तेजन पॅकेज नाही. पॅकेजमुळे नागरिकांचा अपेक्षा भंग झाला आहे. ”

महाराष्ट्राच्या राजकारणावर, राज्यातील परिस्थितीबद्दल टीकेला सामोरे जाणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचा पवारांनी कठोरपणे बचाव केला. “उद्धव ठाकरे हे सरकार आणि विधिमंडळात नवीन आहेत. त्यांच्याकडे मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे अनेक अनुभवी मंत्री आहेत. ठाकरे एक चांगले मुख्यमंत्री आणि एक चांगला संघ नेता म्हणून उदयास आले आहेत हे मी म्हणायलाच पाहिजे. ते युतीतील पक्षांशी नियमितपणे सल्लामसलत करतात आणि मुख्यमंत्र्यांनी स्वत: कर्तव्य बजावण्यासाठी बराच वेळ घालवला आहे, ”असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार – अजित पवार


“सर्व पक्ष (शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस) एकत्र काम करत आहेत आणि आपले सरकार सुरळीत चालणार आहे. येथे कोणत्याही अस्थिरतेबद्दल प्रश्न नाही. गेल्या काही दिवसांतील युतीतील अडचणी आणि सरकार बरखास्त करण्याविषयी चर्चा भाजपच्या एका नेत्याच्या पत्रकार परिषदेतून झाली,” असं शरद पवार म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -