घरमहाराष्ट्रनाशिकमुथूट फायनान्सने केला केरळमधील व्यवसाय बंद

मुथूट फायनान्सने केला केरळमधील व्यवसाय बंद

Subscribe

कर्जदार संभ्रमात; कंपनी सुस्थितीत असल्याचा खुलासा

मुथूट फायनान्सने केरळमधील वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन केरळमधील शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर राज्यांमधील कर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मुथूट फायनान्सने मात्र, कामगार संघटनांच्या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा खुलासा केला आहे. मुथूट फायनान्स ही कर्जपुरवठा करणारी देशातील आघाडीची खासगी संस्था आहे. नाशिकमध्ये या आधी ही संस्था कार्यालयांवरील दरोड्याच्या घटनांमुळे चर्चेत आली होती. त्यातच या कंपनीने केरळ राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन ४ सप्टेंबरपासून केरळमधील शाखा ४ सप्टेंबरपासून बंद करण्याचे जाहीर केले.

यामुळे तेथे नवीन कर्ज देणे बंद केले असून कर्जदारांनी पुढील तीन महिन्यांमध्ये त्यांच्या कर्जाची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शाखा बंद करण्याच्या जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मुथूट फायनान्स आर्थिक संकटात असल्यामुळे ते शाखा बंद करणार असल्याच्या चर्चांमुळे कर्जदारांमध्ये संभ्रम आहे. कंपनीकडे प्रामुख्याने सोने तारणावर कर्ज दिले जाते. त्यात सोन्याचे दर वाढल्यामुळे कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाच्या तुलनेत फायनान्स कंपनीकडील तारणाची किंमत अधिक असल्याने कर्जदार भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुथूट फायनान्सने केवळ केरळ राज्यातील शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे मुख्य कारण कामगार संघटनेकडून होत असलेला त्रास, हे कारण दिले आहे.

- Advertisement -

सीटूच्या त्रासाला कंटाळून बंद

केरळमधील शाखा बंद करण्याबाबत मुथूट फायनान्सचे कार्यकारी संचालक इपेन अलेक्झांडर मुथूट यांनी सीटू या कामगार संघटनेकडून सुरू असलेल्या त्रासाचे कारण दिले आहे. खुलाशात नमूद केल्यानुसार कंपनीसध्या नफ्यात असून मागील दोन वर्षांमध्ये कंपनीचा व्यवसाय २५ हजार कोटींवरून ३५ हजार कोटींपर्यंत गेला आहे. तसेच या काळात कंपनीचा नफा १२०० कोटींवरून २१ कोटींपर्यंत गेला आहे. मात्र, २०१६ पासून सीटू या कामगार संघटनेने केरळमध्ये १२ वेळा केलेल्या संपांमुळे ५२ दिवस कामकाज बंद ठेवण्यात आले होते. देशाच्या एकूण व्यवसायात केरळचा वाटा केवळ ११ टक्के असून तेथील संपामुळे देशभरातील इतर शाखांवरही परिणाम होत असतो. म्हणून हा कर्करोग मुळापासून संपवण्यासाठी कंपनीने केरळमधील व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे इपेन अलेक्झांडर मुथूट यांनी खुलाशात म्हटले आहे. केरळमधील संपामुळे तेथील व्यवसायात प्रचंड घट होऊन सध्या एकूण व्यवसायाच्या केवळ चार टक्के व्यवसाय केरळात असून तेथील व्यवसायावर कंपनी अवलंबून नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -