वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या दारोडा गावातील एका शिक्षेकेवर विकी नगराळे या माथेफिरू तरुणाने पेट्रोल टाकून तिला जाळले होते. तब्बल आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पीडितेचा दि. १० फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर दारोडामधील ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. पोलिसांनी लाठीचार्ज आणि चर्चा केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. साश्रू नयनांनी दारोड्याच्या ग्रामस्थांनी पीडितेला शेवटचा निरोप दिला. त्यानंतर आता दारोडा गावाचे नाव बदलून ‘अंकिता नगर’ नाव देण्यात यावे, अशी मागणी काही लोकांनी पुढे केली आहे.
दारोडा या गावाला पीडितेचे नाव देण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे. तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. रवी रावसाहेब देशमुख यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, दारोड्यातील घटना हृदयद्रावक अशी आहे. या कटू आठवणींना बदलून आमच्या निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी या गावाला तिचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.
शिक्षक तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकी नगराळे या माथेफिरु तरुणाने दि. ३ फेब्रुवारी रोजी तिच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीररित्या जखमी झाली होती. नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तब्बल आठ दिवस डॉक्टरांनी आपल्या प्रयत्नांशी शर्थ केली. मात्र ते पीडितेला वाचवू शकले नाहीत. यानंतर दि. १० फेब्रुवारीला जेव्हा पीडितेचे पार्थिव दारोडा गावात आले त्यावेळी ग्रामस्थांच्या भावनांचा बांध सुटला आणि आक्रमक होत त्यांनी आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याची मागणी लावून धरत रुग्णवाहिकेवर दगडफेक केली.