भाजपने सोलापुरातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करत लिंगायत समाजाचे धर्मगुरू जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला होता. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. यावेळी मात्र शरद बनसोडे यांना दूर करत भाजपने जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे.
मागच्या दोन निवडणुकांची स्थिती-
2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून विजयी झालेल्या सुशीलकुमार शिंदे यांना 3,87,591 इतकी मते मिळाली होती. तर दुसर्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या शरद बनसोडे यांच्या पारड्यात 2,87,959 इतक्या मतदारांनी कौल टाकला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सगळीच पारंपरिक समीकरणे बदलली होती. कारण या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नावाचे देशभर गारूड पसरले होते. याचाच फायदा सोलापुरातून भाजपचे उमेदवार असलेल्या शरद बनसोड यांनाही झाला. या निवडणूक त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा जवळपास दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता.
या मोठ्या विजयाने बनसोडे यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1952 ते 2014 या काळातील 17 निवडणुकांचा लेखाजोखा घेतला असता 17 पैकी 11 वेळा काँग्रेसने बाजी मारली, तर सहावेळा काँग्रेस विरोधकांनी आपला झेंडा रोवत सिक्सर मारला आहे. सध्या या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून ही जागा कायम राखण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. दुसरीकडे भाजपच्या ताब्यातील ही जागा खेचून घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 2004 पर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सर्वसाधारण होता. मतदारसंघ पुनर्रचनेत 2009 पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.
शरद बनसोडे यांना मिळालेली मते – 5,17,879
सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेली मते – 3,68,205
मतदार संख्या आणि स्वरूप
एकूण मतदार – 17, 02, 739
इतक्या लोकांनी बजावला मतदानाचा हक्क – 9,51,510
पुरुष मतदार – 52.49 टक्के
महिला मतदार – 47.51 टक्के
जातनिहाय मतविभागणीचा फटका कोणाला
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून भाजप आणि वंचित आघाडीच्या मतांची भिस्त ही विशिष्ट जाती आणि धर्मावर आधारित आहे. तर काँग्रेस पक्षाची मदार ही सर्वधर्मसमभावावर असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात एकूण सुमारे १८ लाख २१ हजार ७९९ मतदार संख्या असून ज्यामध्ये ९ लाख ४८ हजार ५०८ पुरुष तर ८ लाख ७१ हजार ४१० हजार स्त्री मतदार आहेत. ज्यामध्ये अंदाजे साडेतीन लाख मुस्लीम, तीन ते साडेतीन लाख मराठा , तीन लाख पद्मशाली , नवबौद्ध व पोटजाती तीन लाख, दोन ते तीन लाख धनगर आणि तीन ते साडेतीन लाख लिंगायत समाजाची संख्या आहे. वंचित आघाडीने मुस्लीम, धनगर, नवबौद्ध आदींसह पोटजातींचा मतांचा आधार घेण्याला प्राधान्य दिल्याने तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या मतांनाच थेट प्रकाश आंबेडकर यांनी हात घातल्याने शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इकडे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी लिंगायत मतांसह भाजप आणि शिवसेनेसह तेलगू भाषिक मतांची गोळाबेरीज करायला सुरुवात केल्याने सोलापूर लोकसभा निवडणुकीचे चित्र यंदा वेगळे दिसेल असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.