घरमुंबई'भाजप-शिवसेना सरकारची जाहिरातबाजीमध्येही 'बनवाबनवी'!'

‘भाजप-शिवसेना सरकारची जाहिरातबाजीमध्येही ‘बनवाबनवी’!’

Subscribe

आरोग्य विभागाने केलेल्या जाहिरातबाजीतूनही त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मागील ५ वर्षात राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला फसवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विभागाने केलेल्या जाहिरातबाजीतूनही त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आरोप करतानाच विजय वडेट्टीवार यांनी सरकारी जाहिरातीचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे.

‘सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी’ या जाहिरातीत खोटा दावा

सरकारी जाहिरातबाजीचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले की, “सरकारची ५ वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची आहे. त्यामुळे कोणताही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी दिसत नाही. असे असताना कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत ‘सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी’, या जाहिरातीतून सरकारने आपल्या अपयशावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. पण जाहिरातीत करण्यात आलेला दावा सपशेल खोटा ठरला आहे.”

- Advertisement -

कर्मचाऱ्यांअभावी बाईक ऍम्ब्युलन्सची सेवा बंद

आरोग्य विभागाच्या पानभर जाहिरातीमध्ये बाईक ऍम्ब्युलन्स सेवेमुळे ‘आरोग्यदायी झेप’ घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा करताना दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीला धरून नाही. ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईत १० बाईक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही सेवा सुरु करण्यात आली आणि त्यानंतर मेळघाट, पालघर, गडचिरोली या दुर्गम भागातही सेवेचा विस्तार करण्यात आला. पण सरकारचा कालावधी संपत आला तरीही सेवा सुरु करण्यात येणार असल्याचेच सांगितले आहे. पालघर, मेळघाटमध्ये १० बाईक्सच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेली  सेवा तर वर्षभरातच कर्मचारी वर्ग नसल्यामुळे बंद करण्याची नामुष्की ओढवली असल्याची माहिती आहे. परंतु आरोग्य विभागाला त्याचा पत्ताच नाही.

हेही वाचा – लवकरच मुंबईत माझा भाजपप्रवेश होईल – नारायण राणे

जाहिरातीतील दावा हास्यास्पद

२०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये ३३ लाख रुग्णांना या बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा लाभ झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात ३० बाईक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून ३३ लाख रुग्णांना फायदा, हा दावाच हास्यास्पद आहे. त्यातही ही सेवा ऑगस्ट २०१७ पासून सुरु झाली असताना २०१४ पासून सुरु झाली, हे कशाच्या आधारावर सांगितले आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या मुखपत्रातही जाहिरात झळकली

विशेष म्हणजे आरोग्य विभागाचे मंत्री शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतही खोटी माहिती देण्यात आलेली आहे. आरोग्यमंत्र्यांचा विभागाच्या कामापेक्षा प्रसिद्धीकडे जास्त कल असावा, त्यामुळेच खोटी व कपोलकल्पित माहिती देऊन न केलेली कामगिरी केली, असे सांगण्यासाठी हा खटाटोप केलेला दिसतो आहे. सरकारचा उताविळ कारभार पाहता, ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पिठ खातंय’, अशी अवस्था असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -