तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकललेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमची परीक्षा सोमवारी विनाअडथळा पार पडली. दोन्ही परीक्षेमध्ये ४२०२ म्हणजे ८४.०७ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सकाळी झालेल्या बीएच्या परीक्षेमध्ये ३०४९ विद्यार्थी तर दुपारी झालेल्या बीकॉमच्या परीक्षेत ११५३ विद्यार्थी उपस्थित होते.
तृतीय वर्ष बीएच्या १४ विषयामध्ये परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ३७०७ विद्यार्थ्यांपैकी ३०४९ विद्यार्थ्यांनी म्हणजेच ८२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. बीकॉमचा उपयोजित समूहाचा एक विषय होता. यामध्ये १२९१ विद्यार्थ्यांपैकी ११५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बीकॉममध्ये ८९.३१ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी विद्यापीठाकडून २० ते २५ ऑक्टोबरपर्यंत सहा वेळेस ८०५४ विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली. कॅमेरा असलेल्या कोणत्याही स्मार्टफोनवर, लॅपटॉप किंवा डेक्सटॉप कॉम्प्युटरवर परीक्षा घेण्यात आली. एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी लॉगिन करू नये म्हणून परीक्षेसाठी चार तासाच्या वेळेचा स्लॉट दिला. यामुळे परीक्षेसाठी एकाच वेळी विद्यार्थ्यांनी गर्दी केली नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार परीक्षेसाठी एक तास निवडला. यामुळे विद्यार्थ्यांची विभागणी झाली व परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडली.
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना एसएमएसवर परीक्षेचा संदेश पाठविला, त्यांच्या ईमेलवर परीक्षेची लिंक पाठविण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी १० दूरध्वनी असलेली हेल्पलाईन सुरु केली. एखाद्या विद्यार्थ्याकडे परीक्षेचे प्रवेशपत्र असेल पण काही कारणामुळे लिंक गेली नाही तर त्याला हेल्पलाईनवरून लिंक पाठविली गेली. हेल्पलाईन सेवा सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध आहे. ही हेल्पलाईन मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.
परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक ती सर्व काळजी घेतल्यामुळे, आजची परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली, पुढीलही सर्व परीक्षा व्यवस्थित होतील याची मला आशा आहे.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ