मुंबई हे सर्वाधिक सुरक्षित शहर असे मानले जाते. पण हे शहर आता खरोखरच सुरक्षित राहील आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे . गेल्या ५ वर्षात मुंबईत २ अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार रुपये किंमतीच्या घरफोड्या झाल्याचे समोर आले आहे. माहीती अधिकारातुन ही बाब उघडकीस आली असुन आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी याबाबत अर्ज केला होता. पाच वर्षात झालेल्या या घरफोड्यांच्या रकमेपैकी आतापर्यंत पोलिसांना फक्त ४८ कोटी ७० लाख ३८ हजार रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे.
फक्त १७.५ टक्के रक्कम हस्तगत
मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने ९४९ कोटी रुपये खर्च करुन ६००० कॅमरे २०१६ मध्ये लावण्यात आले आहेत. पण तरीसूद्धा मुंबईत होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. बृहन्मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) श्री. जनार्दन थोरात यांनी शकील अहमद शेख यांना हि माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये १ जानेवारी २०१३ पासुन २०१८ या सालांपर्यंत म्हणजेच पाच वर्षांत एकुण घरफोड्यांची आकडेवारी देण्यात आलेली आहे. मात्र चोरी झालेल्या रक्कमेपैकी फक्त १७.५ टक्के रक्कमच मुंबई पोलिसांना मिळवण्यास यश आलेले आहे.