बदलापूर । ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथमध्ये अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अंबरनाथ, बदलापूरकरांची एकच तारांबळ उडवून दिली. संध्याकाळी सव्वा सातच्या चमकणार्या विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. ठाणे शहरातही सायंकाळी थेंब थेंप पावसाचा शिडकावा झाला.
या पावसामुळे रविवारी संध्याकाळी बाजारात खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्यांची तसेच बाहेरून घरी परतणार्यांची एकच तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी काहींनी रस्त्यालगतच्या दुकानांच्या शेड, उड्डाणपूलाखाली, स्कायवॉकवर तसेच मिळेल तिथे आसरा घेतला. तर काहींनी रिक्षा पकडून घर गाठणे पसंत केले. बच्चेकंपनीने इमारतीच्या आवारात, रस्त्यावर पावसात भिजण्याचा आनंद लुटला. गेल्या काही दिवसांपासून उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. अवकाळी पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या बदलापूरकरांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या अवेळी आलेल्या पावसामुळे येत्या एक दोन दिवसांत मोठा उकाडा जाणवणार असल्याची शक्यता आहे.
अंबरनाथमध्ये पावसामुळे वीज गायब
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची तारांबळ झाली. त्यातच अंबरनाथमधील काही भागातील वीज गायब झाली. परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ठिकठिकाणी मिरवणुका, सामाजिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. पावसामुळे कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली.