सैराट मधल्या झिंगाट गाण्याचा आधार घेत मुंबईत साचलेलं पाणी आणि सध्या गाजत असलेल्या खड्डे प्रश्नावर आरजे मलिष्काने ‘गेली गेली मुंबई खड्डयात’ हे गाणे बनवले. हे गाणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाले. पण आता मलिष्काच्या ऑफिसमध्ये मात्र धमकीचे फोन यायला सुरुवात झाली आहे. ‘मुंबई तुझा माझ्यावर भरवसा नाही का’ या धम्माल गाण्यानंतर मलिष्का हे गाणे घेऊन आली आहे. या गाण्यामुळे शिवसेना नेत्यांचा राग अनावर झाला असून सोलापूरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रावण भवर यांचे चिरंजीव अतुल भवर यांनी मलिष्काच्या ऑफिसमध्ये फोन करुन धमकी दिली आहे. अतुल भवर हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यामुळे मलिष्काने बनवलेलं ‘गेली मुंबई खड्ड्यात गेली’ हे गाणं त्यांना अजिबात आवडलं नाही. म्हणून त्यांनी मलिष्काला धमकी दिली असल्याचे समजते आहे.
दरम्यान, मागच्या वेळी ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’ हे गाणे मलिष्काने सादर केल्यानंतर शिवसेवनेकडून मलिष्कावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर यावेळीही मलिष्काला शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागले असल्याचे दिसत आहे.
काय दिली धमकी
“गाण्याच्या माध्यमातून दरवेळी मुंबईला बदनाम करण्याचा मलिष्काने ठेका घेतला आहे का? मुंबईसाठी १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले असून जरी मी मुंबईत राहत नसलो तरी ती आमची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही. मलिष्काने याची खबरदारी घ्यावी अन्यथा शिवसेनेच्या रणरागिणी रेडिओ एफएमच्या ऑफिसमध्ये घुसून मारतील,” अशी धमकी अतुल भवर यांनी रेडिओ एफएमच्या ऑफिसमध्ये फोन करुन दिली आहे.