इतिहासातून जो देश शिकतो त्याचे भविष्य उज्ज्वल असते. परंतु जो शिकत नाही त्या देशाचा भूगोल बिघडतो, असा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकरांनी यांनी दिला. डाव्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील ‘हे मृत्युंजय’ नाटक हाऊसफुल्ल ठरले, त्यावेळी ते बोलत होते. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उद्देश जरी चांगला होता, असे मानले तरी आपल्या इतिहासातून धडा घेण्यात ते कमी पडले आणि म्हणूनच पाकिस्तान तसेच चीनच्या बाबतीत आपल्या चुका झाल्याचा ठपका सावरकरांनी ठेवला. मात्र आता काळ बदलत असून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा इतिहासाचे अभ्यासक असून सावरकर आणि चाणक्यनीतीनुसार ते काम करत असल्याचे सांगत त्यांनी भाजपा सरकारवर स्तुतीसुमनेही उधळली.
जेएनयूत अशीही नारेबाजी
या नाटकाच्या शेवटी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या ‘भारतमाता की जय’च्या जयघोषाने जेएनयूचे ऑडिटोरियम दणाणून सोडले. हे नाटक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच जेएनयूमधील प्राध्यापकवर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. जेएनयूमध्ये सावरकर अध्यासन सुरू करण्यासाठी अभाविप आक्रमक असून यावेळी जेएनयूमध्ये येत्या वर्षात स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा जेएनयू अभाविपचे मंत्री मनीष जांगड आणि अध्यक्ष दुर्गेश कुमार यांनी केली.