घरमुंबईडबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत

डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत

Subscribe

मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. कर्ज देण्यासंदर्भात खोटी आश्वासने देऊन फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली सोमवारी रात्री तळेकर यांना पोलिसांनी अटक केली. मुंबईतील डबेवाल्यांच्या एका संघटनेने तळेकरांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आमच्या एका टीमने तळेकर यांना पुणे जिल्ह्यात असणार्‍या त्यांच्या गावातून ताब्यात घेतले. मंगळवारी सकाळी तळेकर यांना मुंबईत आणण्यात आले. बुधवारी पोलीस तळेकरांना न्यायालयासमोर हजर करतील, अशी माहिती घाटकोपर पोलीस स्थानकातील वरिष्ठ निरीक्षक असणार्‍या निती अलकनुरे यांनी दिली.

- Advertisement -

या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलीस तळेकर यांच्यासोबतच त्यांचे साथीदार असणार्‍या विठ्ठल सावंत यांच्याही मागावर आहेत. सावंत हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घाटकोपर पोलिसांनी मागील वर्षी म्हणजेच २०२० साली फेब्रुवारी महिन्यामध्ये तळेकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसर्‍या डबेवाल्या संघटनेतील २२ डबेवाल्यांच्या नावाने दुचाकी (मोपेड्स) घेण्यासाठी तळेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कर्ज घेतले. मात्र, या डबेवाल्यांना त्यांनी दुचाकी दिल्या नाहीत, असा आरोप तक्रारदार डबेवाल्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी फसवणूक, विश्वासघात करणे या गुन्ह्यांखाली कारवाई केली आहे.

तळेकर हे मुंबई जीवन डबे वाहतूक मंडळ या संघटनेचे प्रवक्ते होते. याच संघटनेतील डबेवाल्यांची तळेकर यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर तळेकर यांना प्रवक्तेपदावरुन काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुंबई डबेवाला असोसिएशनची स्थापना करुन त्याचे अध्यक्षपद भूषवले.

- Advertisement -

कोरोनामुळे मुंबईकरांचे पोट भरणार्‍या डबेवाल्यांनाही मोठा फटका बसला आहे. मागील नऊ महिन्यांपासून डबेवाल्यांचे वेळापत्रक आणि व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असून अनेक डबेवाल्यांकडे आजही काम नाहीय. मागील १२५ वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत असणार्‍या डबेवाल्यांवर पहिल्यांदाच एवढ्या दिर्घकाळ कामाशिवाय राहण्याची वेळ आली आहे. डबेवाल्यांना मदत करण्यासाठी शहरातील अनेक डबेवाल्या संघटनांनी नाशिक आणि पुण्यातील १७ स्थानिक गटांशी आणि ग्रामपंचायतींशी चर्चा करुन मुंबईमध्ये भाज्यांचे स्टॉल सुरु केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -