उल्हासनगरातील महक ही पाच मजली इमारत कलल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे येथील रहिवाशांचे दरवाजे जाम झाले होते. अखेर अग्निशमन दलाने या इमारतीत शिरून १५० रहिवाशांना बाहेर काढले. यावेळी उल्हासनगर महापालिकेने ही इमारत तातडीने रिकामी करून प्रवेशासाठी बंद केली. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. ही इमारत कलली नसती तर रहिवाशांना हा धोका लक्षात आला नसता. त्यामुळे इमारतीमधील रहिवासी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत.
ही इमारत उल्हासनगर फर्निचर बाजारपेठेच्या लिंकरोडवर होती. त्यात 31 फ्लॅट होते. पालिकेने जाहीर केलेल्या अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश नसल्याने नागरिक गुण्यागोविंदाने निश्चिंतपणे राहत होते. मात्र सोमववारी सकाळच्या सुमारास ही इमारत अचानक झुकली. त्यावेळी दरवाजे जाम झाल्याने रहिवासी अडकून पडले. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी माजी नगरसेवक नरेंद्रकुमारी ठाकुर, नारायण पंजाबी यांना फोन केले. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानव्ये सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी धाव घेऊन जाम झालेले दरवाजे उघडून ३१ फ्लॅटमधील रहिवाशांना बाहेर काढून इमारत रिकामी केली.
वास्तुविशारदाचा सल्ला चुकला
एका वास्तुविशारदने सोमवारी सकाळी महक इमारतीची पाहणी केली. आणि इमारतीला पिलरांचा आधार दिला तर सर्व व्यवस्थित होईल, असा धीर दिला. मात्र तो गेल्यावर काहीच मिनिटांत इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. ही इमारत एका बाजूला झुकली आहे. हे जगदीश भोजवाणी या नागरिकाच्या निदर्शनास आले. त्याने लगेच ही बाब इमारतीचे रहिवाशी आणि मनपा प्रशासनाला कळविली होती. भोजवाणीच्या सतर्कतेमुळेच इमारतीतील रहिवाशांचे प्राण वाचले.
मनपा अधिकारी भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांना फोन येताच त्यांनी धाव घेऊन इमारत खाली केली. त्यामुळे 150 जीव वाचले.
-सुधाकर देशमुख, महापालिका आयुक्त,उल्हासनगर