पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईच्या समुद्रात जाताना काळजी घेण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून आणि किनाऱ्यावरच्या जीवरक्षकांकडून देखील केलं जातं. मात्र, अनेकचा या किनाऱ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांकडून त्याचं पालन केलं जात नाही. त्यामुळे मोठ्या दुर्घटना देखील ओढवतात. अशीच एक दुर्घटना मुंबईच्या जुहू किनारपट्टीवर घडली असून समुद्राच्या पाण्यात पोहत असताना १ तरुणी आणि एका मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या दोघींना पाण्याबाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे या दोघींना मृत घोषित करण्यात आले आहे.
कधी घडली घटना?
संध्याकाळी ५च्या सुमारास २९ वर्षांची माया महेंद्र आणि १५ वर्षांची निशा कवनपाल सिंग जुहू बीचवर कोळीवाड्याजवळ समुद्राच्या पाण्यात पोहत होत्या. मात्र, अचानक त्या बुडायला लागल्या. हे पाहून समुद्रकिनारी असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, जीवरक्षक पोहोचेपर्यंत त्या दोघी बुडाल्या होत्या. संध्याकाळी सहाच्या सुमारास या दोघींना पाण्याबाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दोघी सायन येथे राहण्यास होत्या. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसानी अपमृत्यूची नोंद केली आहे.