घरमुंबईमुंबईला पूरमुक्त करण्यासाठी ‘वॉटर ग्रीड’चा पर्याय

मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी ‘वॉटर ग्रीड’चा पर्याय

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गडकरी यांनी ही सूचना केली आहे.

मुंबईतील पुराच्या नियमित संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात ‘राज्य वॉटर ग्रीड’ची स्थापना करण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गडकरी यांनी ही सूचना केली आहे. वॉटर ग्रीडची स्थापना केल्यानंतर दुष्काळी भागांमध्ये पाण्याची उपब्धता सुनिश्चित करता येईल, असे गडकरी यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबईत दरवर्षी पुरामुळे प्रचंड नुकसान होते. म्हणून, नुकसान टाळण्यासाठी पुरस्थिती हाताळण्यासाठी एकात्मिक आराखड्याची आवश्यकता आहे. व्यवस्थित नियोजन केले तर पुराचे पाणी, सांडपाणी आणि गटारांतील पाणी ठाण्याकडे वळवता येईल आणि वळवण्यात आलेले पूर्ण पाणी प्रक्रिया करुन धरणात साठवता येईल. हे पाणी जलसिंचन, शहराजवळील उद्योग आणि आसपासच्या फलोत्पादन पट्ट्याला देता येईल. अतिरिक्त पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागाकडे नेता येईल. शाश्वत उपाययोजना म्हणून मुंबई आणि उपनगरांतील मोठ्या वसाहतींमध्ये पाणी प्रक्रिया केंद्राची स्थापना करता येईल, असे गडकरी यांनी पत्रात लिहिले आहे.

- Advertisement -

मुंबईतील पूराची समस्या, नाले व्यवस्थापन, सांडपाणी, पिण्याचे पाणी हे विषय एकमेकांशी संलग्न आणि सुसंगत आहेत, त्यामुळे याविषयी एकात्मिक विचार करण्याची आवश्यकता आहे. ही समस्या केवळ मुंबईपुरती मर्यादित नसल्याने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या समन्वयाने तसेच आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मदतीने राज्य सरकारने तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर करावा, असेही गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलस्रोत मंत्री जयंत पाटील आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे

मुंबईतील पावसात डांबरी रस्ते टिकणारे नाहीत. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. असे सांगत त्यांनी दोन दशकांपूर्वी बांधलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग अद्यापही सुस्थितीत असल्याचे उदाहरण दिले. याच धर्तीवर, मल:निस्सारण आणि पूराचे पाणी वाहून नेण्यासाठी प्रगत जलवाहिनी प्रणालीसह काँक्रीटचे रस्ते मुंबईत बांधले जाऊ शकतात, असे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -