चेन्नई विमानतळावरून अपहरण करून कारने पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन एका नौदल अधिकार्याला जिवंत जाळण्यात आल्याची भीषण घटना शुक्रवारी घडली. सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७) असे या अधिकार्याचे नाव असून तो झारखंडच्या रांचीतील असल्याचे सांगण्यात आले. होरपळलेल्या दुबेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी त्याला आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविल्यानंतर तेथे शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
तीन दिवस चेन्नईत कोंडून ठेवले
भारतीय नौदलात सिबिंग सीमॅनपदी रुजू झालेला मिथिलेश दुबे ३१ जानेवारीला चेन्नई विमानतळावर पोहचला. तेथूनच तीन अज्ञातांनी त्याचे अपहरण करून त्याला तीन दिवस चेन्नईला अज्ञात स्थळी कोंडून ठेवले. अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दुबेला कारमधून ५ फेब्रुवारीला महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास आणले. त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवले.
मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
जंगलात विवस्त्र होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला पाहिल्यावर स्थानिकांनी घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत वेवजी पोलीस चौकीला माहिती सांगितली. पोलिसांनी त्वरित दुबेला डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला मुंबईत हलविण्यात आले, तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३६४, ३९२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा – सचिनच्या कटआऊटवर काळं तेल ओतल्याने देवेंद्र फडणवीस संतापले