राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना सर्वाधिक फटका असला असून, पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची आढावा घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास नागपूरात दाखल झाले. त्यानंतर आज ते वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. (deputy cm devendra fadnavis visit to wardha chandrapur in Vidarbha for flood situation)
मुसळधार पावसामुळे वर्ध्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ही आपात्कालीन परिस्थिती आहे. आम्ही सर्व अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहोत. मी स्वतः वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे”, असे याआधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार, आज ते दौरा करणार असून, नागपूर विभागातील (Nagpur Division) अधिकाऱ्यांची (Officer) बैठक ही घेणार आहेत.
नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. आमदार आशिष जयस्वाल, समीर कुणावार, कृष्णा खोपडे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नागपूर येथे यासंदर्भात विभागस्तरीय आढावा बैठक घेतील.
ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक येथे सुद्धा पुराच्या पाण्याने शिरकाव केला. मागील दहा दिवसात दुसऱ्यांदा गावात पाणी शिरल्याने नागरिक संकटात सापडले आहे. नागरिकांकडून आता गावाचे पुनर्वसन करा अशी मागणी केली जाते आहे. गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हळविण्यात आले आहे. या पावसामुळे अनेक घरांची पडझड सुद्धा झाली आहे.
गावातीलच लेंडी नाला आणी लाडकी नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीपासूनच घरात पाणी शिरायला सुरवात झाल्याने नागरिकांनी घराच्या उंच ठिकाणी जातं स्वतःला सुरक्षित ठेवले. नऊ जुलैला यापूर्वी आलेल्या पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
त्याशिवाय, चिमूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे उमा नदीला पूर आला आहे. उमा नदीच्या पुरामुळे पुढच्या भागातील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे मूल-चामोर्शी मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली. तसेच, जिल्ह्यातील अनेक मार्ग पुराच्या पाण्याने बंद असताना हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जाणारा आणखी एक मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावून दोन्ही बाजूला वाहनधारकांना वाहतुकीस मनाई केली. परिणामी वाहनचालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता