“लोकपाल आंदोलनामुळेच भाजपला सत्ता मिळाली. मात्र आज ते लोकपालबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. २०१४ साली भाजपने माझा वापर केला. हे सरकार माझ्या मनातून उतरले आहे.”, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज व्यक्त केली. लोकपालच्या नियुक्तीसाठी अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. आज सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आणि भाजपवर टीकास्त्र सोडले.
‘या नालायक माणसांसाठी जीवाची बाजी लावू नका’; राज ठाकरेंची अण्णांना सूचना
अण्णा पुढे म्हणाले की, “माझ्या ९० टक्के मागण्या मान्य झाले, असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. मात्र हे साफ खोटे आहे. माझ्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी उपोषण कशाला सुरु ठेवले असते? आता हे सरकार उलथवून लावले तरी काहीही फरक पडणार नाही. सत्ता बदलून काहीही होणार नसून व्यवस्था बदलली पाहीजे.” अशी ठाम भूमिका अण्णा हजारे यांनी मांडली आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उपोषण मागे घेणार का? असा प्रश्न अण्णा हजारे यांना विचारला असता ते म्हणाले की, मी आणखी पाच दिवस उपोषण करु शकतो. माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही यावेळी अण्णांनी केला.