केईएम हॉस्पिटलात अनेक प्रकारच्या स्तनांच्या विकारांवर उपचार केले जातात. २०११ पासून ते २०१८ पर्यंत ५ हजार ५०० रुग्णांची तपासणी केली. त्यातील ५०० हून अधिक रुग्णांना स्तनांचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे, ही एक गंभीर बाब आहे. अजूनही ९० टक्के रुग्ण स्तनांचा कर्करोग दुसर्या टप्प्यात गेलेला असताना येतात. कारण अजूनही ब्रेस्ट कॅन्सर आणि त्यांच्या लक्षणांबाबत महिलांमध्ये जागृती झालेली नाही, पण जर ब्रेस्ट कॅन्सरचे लवकर निदान झाले, तर स्तन काढण्याची गरज भासत नाही.
स्तनाला एखादी गाठ जाणवणे किंवा काखेत गाठ होणे, ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात, पण याशिवायही स्तनांमध्ये अनेक बदल होतात. स्तनांमधील अशाच बदलांकडे किंवा स्तनांच्या दुखण्यांकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात, पण स्तनांमधील बदल आणि दुखणे हे एकप्रकारे संसर्ग असू शकतो आणि त्याचे वेळीच निदान उपचार न झाल्यास कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. रुग्णांना किमोथेरपी, हार्मोनल थेरेपी, कॅन्सरचा आकार कमी करून ब्रेस्ट वाचवण्यात आले आहेत. त्यानंतर इम्प्लांट न वापरता रुग्णांचे स्वत:चे टिश्यूस वापरून रिकंट्रक्शन केले जाते. ४० ते ५० वयोगटातील महिलांना हा आजार जास्त होत असल्याचे दिसून येत असल्याचे केईएम हॉस्पिटलच्या जनरल सर्जरी विभागाच्या प्राध्यापक आणि ब्रेस्ट सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पा राव यांनी सांगितले.
सध्या स्तनाच्या कर्करोगात स्तन वाचवता येऊ शकतात का? यावर संशोधन केले जाते. टाटा हॉस्पिटलातूनही बरेच रुग्ण इथे पाठवले जातात, पण या प्रकारच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी वेगवेगळे कॅम्प्स, बोर्ड्स लावले जातात. प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी एक लाईव्ह ट्रेनिंग दिले गेेले. ज्यामुळे, मॅमोग्राफी कशी केली जाते याचेही ट्रेनिंग दिले जाते.
– डॉ. शिल्पा राव, प्रमुख, ब्रेस्ट सर्जरी विभाग, केईएम हॉस्पिटल