भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले काँग्रेस पक्षाकडून नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. नागपुरात त्यांची लढत भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात असणार आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘नरेंद्र आणि देवेंद्र यांना मारायचं की सोडायचं ते ठरवा’, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
‘नरेंद्र आणि देवेंद्र म्हणजे इंद्र देव’
‘इंद्र देवाचा करिश्मा तुम्हाला माहीत आहे. इंद्र देव फार बदमाश होता आणि लालचीही होता. मात्र, त्याच्यावर संकट आले तर तो मोठ्या देवांकडे धावायचा. इथे दोन्ही दोन्ही इंद्र आहेत. वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र. आता या दोन्ही इंद्राचं काय करायचं? यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे’, असं नाना पटोले कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारणात नवा वाद उफाळू शकतो.
नाना पटोले मोदींच्या कार्यशैलीवर नाराज
गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पटोले विजयी झाले होते. मात्र, २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया येथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचे मधुकर कुकडे वियजी झाले होते.
हेही वाचा – नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले लोकसभा रिंगणात