सतराव्या लोकसभेसाठी भारतात मोठ्या उत्साहात मतदान सुरु आहे. आजच लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना विरोधी पक्षांच्यावतीने मात्र EVM मशीनवर शंका उपस्थित केली आहे. “निवडणूक आयोग कितीही दावे करत असले तरी ईव्हीएम मशीन बाहेरून नियंत्रित करता येऊ शकते. रशिया मधील काही लोक पैशांच्या बदल्यात ईव्हीएममध्ये छेडछाड करु शकतात”, असे धक्कादायक विधान तेलगू देसमचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
नायडू यांनी आपल्या दाव्याबाबत अधिक स्पष्ट माहिती दिली नाही. लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन मधून येणाऱ्या ५० टक्के पावत्यांचीही मतमोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे नायडू यांनी सांगितले.
“व्हीव्हीपॅट यंत्रणेसाठी सरकारने ९ हजार कोटींचा खर्च केला आहे. पोलिंग ऑफिसर आणि पोलिंग बुथवरील कर्मचारी हे टेक्नोसॅव्ही नाहीत. तसेच ईव्हीएम मशीनचे ऑडिट करण्याची कोणतीही व्यवस्था आपल्या देशात नाही. आंध्र प्रदेश राज्यात जेव्हा पहिल्या दोन टप्प्यात निवडणूक झाली तेव्हा अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलेल्या आहेत.
तसेच आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सीताराम येचुरी यांनी देखील त्यांच्या राज्यात ईव्हीएम बिघाड होत असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे जनतेच्या हजारो कोटींचा वापर जर योग्य सरकार निवडण्यासाठी होत नसेल, तर ही यंत्रणा काय कामाची?” असा प्रश्न देखील नायडू यांनी उपस्थित केला.
EVMs across India malfunctioning or voting for the BJP. DMs say poll officials untrained to operate EVMs. 350+ being replaced. This is criminal negligence for a polling exercise that costs 50,000 crs.
Should we believe DMs @ECISVEEP, or is something far more sinister afoot? pic.twitter.com/eGsGUUBWai
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 23, 2019
विकसित देशांनी ईव्हीएम नाकारले
जगभरातील १९१ देशांपैकी फक्त १९ देशांमध्ये ईव्हीएम वापरले जात आहे. यामध्ये भारत आणि इतर विकसनशील देश आहेत. मात्र जर्मनी सारख्या तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या देशाने ईव्हीएम लोकशाही विरोधी असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली आहे. जपान, अमेरिका सारख्या देशातही ईव्हीएम वापरले जात नाही.
मग भारतातच ईव्हीएमची सक्ती का केली जात आहे? इतर विकसित देशांप्रमाणे भारताने पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घ्यावे. हा मुद्दा मी २००९, २०१४ आणि या निवडणूकीत देखील मांडत असल्याचे नायडू यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग, सीपीआय(एम) महेंद्र सिंग, पीसीसीच्या शांती चौहान, तृणमूल काँग्रेस खासदार नझमूल हक, भारतीय मुस्लिम लिगचे कोरम ओमर, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य डॉ. जी.एच. फर्नांडिस,लोक तांत्रिक जनता दलाचे आमदार कपिल पाटील, डीएमकेचे खासदार टी.के.एस. इलांगोवल आणि सीपीआय महाराष्ट्रचे प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
शरद पवार यांनी देखील उपस्थित केली शंका..
मी अनेक मतदारसंघात फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण #EVM हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा #EVMs मध्ये गडबड केली जाऊ शकते.#LokSabhaElections2019 pic.twitter.com/norhSubjTl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 23, 2019