गुजरातमधील २००२ च्या गोध्रा हत्याकांड प्रकरणी आज मोठी सुनावणी झाली. अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने गोध्रा हत्याकांड प्रकरणात दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर ३ जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. गोध्रा हत्यकांड प्रकरणातील ५ आरोपी फररा होते. या आरोपींना २०१५-१६मध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. या पाच आरोपींना आधीच याप्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. आज त्यांना अहमदाबादच्या विशेष एसआयटी न्यायालयात हजर करण्यात आले असता कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.
2002 Godhra train burning case: Two accused found guilty, three acquitted by special SIT court in Ahmedabad. #Gujarat pic.twitter.com/NzTImuaYAa
— ANI (@ANI) August 27, 2018
२ जणांना जन्मठेप तर ३ जणांची सुटका
गोध्रा हत्याकांड प्रकरणी आज अहमदाबादच्या विशेष न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली. आरोपी इमरान उर्फ शेरु भटुक आणि फारुख भाना, हुसैन सुलेमान मोहन, फारुक धांतिया, कासम भमेडी यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने इमरान उर्फ शेरु भटुक आणि फारुख भाना यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, हुसैन सुलेमान मोहन, फारुक धांतिया आणि कासम भमेडी यांची निर्दोष सुटका केली. या पाचही आरोपींवर साबरमती एक्स्प्रेलच्या डब्याला आग लावण्याचा आरोप होता.
याआधी ११ जणांना फाशी तर २० जणांना जन्मठेप
साबरमती कारागृहाच्या विशेष न्यायालयाने गोध्रा हत्याकांड प्रकरणी आधीच सुनावणी केली होती. ज्यामध्ये ११ जणांना फाशीची आणि २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर ६३ जणांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर आता उर्वरीत सहा आरोपींविरोधात न्यायलयाने आज निर्णय दिला. सहा आरोपींपैकी कादिर पटालियाचे जानेवारी महिन्यात हार्टअटॅकने निधन झाले. तर उर्वरीत पाच जणांविरोधात आज न्यायालयाने निर्णय दिला. यामध्ये दोन जणांना जन्मठेप तर ३ जणांची सुटका करण्यात आली आहे.
२००२ मध्ये झाले होते गोध्रा हत्याकांड
अहमदाबादपासून १३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोध्रा स्टेशनवर २७ फेब्रुवारी २००२ला गोध्रा हत्याकांड झाले होते. साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लावण्यात आली होती. यामध्ये ५९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये आयोध्यातून परतणाऱ्या कारसेवकांचा समावेश होता. या गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगल पेटली होती. याप्रकरणातील आरोपींनी दावा केला होता की, त्यांनी साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावली नव्हती.